Dilip Deshmukh-Dhiraj Deshmukh
Dilip Deshmukh-Dhiraj Deshmukh Sarkarnama
मराठवाडा

काका-पुतण्यातील कुरघोडीच्या राजकारणाला छेद देत दिलीप देशमुखांचा वेगळाच पॅटर्न

सरकारनामा ब्युरो

लातूर ः राज्यात काका-पुतण्यामधील कुरघोडीचे राजकारण आणि त्याची पंरपरा अनेक भागात पुढे सुरू असतांना आपण पाहतो. पण मराठवाड्यातील (Marathwada) लातूर जिल्हा आणि देशमुख कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या निधनानंतर त्यांचे बंधु माजीमंत्री दिलीप देशमुख (Diliprao Deshmukh) यांनी नुकत्याच झालेल्या लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकारणातल्या वेगळ्याच पॅटर्नचे दर्शन घडवले.

तरुणांच्या हाती नेतृत्व सोपवण्याचे केवळ भाषणात सांगून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पुतण्या आमदार धीरज देशमुख यांना थेट लातूर जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदावर बसवले. काका-पुतण्यामधील या आगळ्या-वेगळ्या राजकारणातील नव्या पॅटर्नची चर्चा यामुळेच राज्यभरात सुरू आहे.

उस्मानाबाद-लातूरमधून नव्या जिल्ह्याची निर्मिती होऊन लातूर स्वतंत्र जिल्हा झाला तेव्हा पासून जिल्हा बॅंकेत देशमुखांची चलती होती. ती या बॅंकेने १३ चेअरमन पाहिल्यानंतरही कायम आहे. लातूर जेव्हा उस्मानाबाद जिल्ह्याचा भाग होते तेव्हा देखील उस्मानाबाद जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात दिवंगत नेते विलासराव देशमुख हे संचालक म्हणून कार्यरत होते. पुढे ते आमदार झाले आणि विधानसभेवर निवडून गेले.

लातूर जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा बॅंकेवर देशमुख कुटुंबाचेच वर्चस्व राहिले. उस्मानाबाद जिल्हा बॅंकेत संचालक राहिलेले विलासराव देशमुख पुढे आमदार झाले, लातूर जिल्हा वेगळा झाला आणि बॅंकेची सुत्र त्यांचे बंधु दिलीपराव देशमुख यांच्या हाती आली. विलासराव राजकारणात जसजसे मोठ्या पदावर गेले तसं जिल्ह्यातील राजकीय सत्ता केंद्र दिलीपराव यांच्याकडे सरकले. अर्थात दोन भावांमध्ये असलेल्या समन्वयामुळे जिल्हा बॅंक असो की संघटने संदर्भातील विषय निर्णय एकमतानेच घेतला जायचा.

विलासराव देशमुख उस्मानाबाद जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून कार्यरत होते, पण त्यांना अध्यक्षपद मात्र लातूर जिल्हा बॅंके स्वंतत्र झाल्यानंतरही भुषवता आले नाही. ते विधानसभेवर निवडून गेल्यानंतर १९८६ ते ९२ ही सहा वर्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मात्र अध्यक्षपद भुषवले. सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आणि संचालक मंडळ, प्रशासनावरील पकड या जोरावर त्यांनी लातूर जिल्हा बॅंकेला राज्यातील एक अग्रगण्य सहकारी बॅंक म्हणून लौकिक प्राप्त करून दिला.

जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून पुढे अमित देशमुख आणि आता धीरज देशमुख या दोन्ही आमदार बंधूंचे राजकारण देखील जोमाने सुरू आहे. आतापर्यंत लातूर जिल्हा बॅंकेला १३ अध्यक्ष लाभले. अर्थात त्यांचे खरे सुत्रधार हे विलासराव आणि दिलीपरावच होते हे लपून राहिले नाही. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर दिलीपराव यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांना सुरक्षा कवच द्यावे, अशा पद्धतीने घडवले.

राजकारणात कधी, कुठे थांबावे याचे उत्तम टायमिंग साधत दिलीप देशमुख यांनी जिल्हा बॅंकेचा मुहूर्त निवडला. लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडून आलेल्या पुतणे धीरज यांच्यावर जिल्हा बॅंकेची देखील जबाबदारी सोपवत त्यांना सहकारात पारंगत करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे काका दिलीप देशमुख यांचे हे पहिले पाऊल होते. विलासराव देशमुख हे जिल्हा बॅंकेत संचालक झाले, त्यानंतर विधानसभेवर निवडून गेले, तर धीरज देशमुख आधी आमदार झाले आणि मग जिल्हा बॅंकेवर संचालक आणि आता चेअरमन झाले.

लातूर जिल्हा बॅंकेवर सातत्याने वर्चस्व मिळवत देशमुख कुटुंबाने विरोधकांना चारीमुंड्या चीत केल्याचे यावेळीही दिसून आले. राज्यातील इतर जिल्हा बॅंकेच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेले कुरघोडीचे राजकारण एकीकडे तर लातूर बॅंकेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदावर झालेली बिनविरोध निवड एकीकडे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT