Dr.Bhagwat Karad News Sarkarnama
मराठवाडा

Dr.Bhagwat Karad News : डाॅ. भागवत कराड संभाजीनगरकरांना चोवीस तास पाणी पाजणारच..

Jagdish Pansare

Marathwada BJP News : छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीप्रश्न येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. राज्यात आणि महापालिकेतही वर्षानुवर्ष सत्ता असलेल्या पक्षांनी शहराच्या पाणीप्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. महापालिकेत शिवसेना-भाजपने 25 वर्ष एकत्रितपणे सत्ता उपभोगली. पण पाण्याच्या प्रश्ननावर दोघांनीही कायम ऐकमेकांकडेच बोटं दाखवली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवण्यासाठी केंद्र आणि राज्याच्या सत्तेवर असलेल्या भाजपच्या नेत्यांनी शक्तीपणाला लावली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मंजूर झालेली 1680 कोटींची पाणीपुरवठा योजना केंद्राच्या अमृत योजनेत गेली. आता ती अडीच हजार कोटींवर पोहचली. लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापुर्वी शहरवासियांना नियमित पाणी देण्याचे आश्वासन राज्यसभेवर निवडून गेलेल्या आणि नंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झालेल्या डाॅ. भागवत कराड यांनी दिले होते. या पाणीपुरवठा योजनेचा समावेश केंद्राच्या अमृत योजनेत करण्यासाठीही कराड यांनीच पुढाकार घेतला. आता 2024 अखेरपर्यंत संभाजीनगरकरांना सात दिवस चोवीस तास पाणी दण्याचा चंगच कराड यांनी बांधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीपुर्वी पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण करून संभाजीनगरकरांना नियमित पाणी पाजण्याचे श्रेय भाजपला घ्यायचे होते. यासाठी कराड यांनी बैठकांवर बैठका घेत योजनेचा आढावा घेतला. कंत्राटदारांना दमही भरला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता डिसेंबर 2024 पर्यंत सात दिवस चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचा नवा मुहूर्त ठरला आहे. अमृतमध्ये समावेश करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा आता नल से जल योजनेत समावेश करण्यात आला आहे. शहराच्या 2740 कोटी रुपयांची ही पाणी योजना आहे.

देशात छत्रपती संभाजीनगर व कोईमतूर या शहरांमध्ये सध्या नल से जल योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. योजना वेळेत पूर्ण झाल्यास छत्रपती संभाजीनगर बाजी मारू शकते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर 24 तास सात दिवस पाणी देणारे देशातील पहिले शहर ठरणार आहे. पाणी योजनेचे काम सध्या 40 ते 50 टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नळाला मोटार लावण्याची गरज पडणार नाही. चौथ्या मजल्यापर्यंत पाणी प्रेशरने येणार आहे.

दरम्यान सर्व नळांना मिटर बसविले जाणार आहेत. शंभर टक्के मिटर बसल्यानंतर 24 तास सात दिवस पाण्याचा प्रयोग यशस्वी होणार आहे. जगन्नाथपुरी येथे अशा प्रकारचा प्रकल्प यशस्वी झाला आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने देशभरातून 610 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT