Raosaheb Danve Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve : दिल तो बच्चा है जी..! पराभवानंतरही रावसाहेब दानवेंनी शब्द पाळला...

Tushar Patil

Jalna : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी श्री क्षेत्र राजुर येथे टॉय ट्रेनमधून केलेल्या सफरीची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे लोकसभेतील पराभवानंतरही दानवे यांचे रेल्वे प्रेम लपून राहिलेले नाही. दारुण पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे दुसऱ्या दिवसापासून पुन्हा मतदारसंघात कामाला लागले आहेत.

चाळीस वर्ष राजकारणात असलेले दानवे एका पराभवाने शांत बसतील तर ते रावसाहेब कसले. मतदारसंघात त्यांनी नियमित दौरे सुरूच ठेवले आहेत. रेल्वेमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी जालना- जळगाव या रेल्वे मार्गाला मंजुरी दिली व सर्वेक्षण देखील करून आणले.

लोकसभेत सलग पाचवेळा निवडून आल्यानंतर सहाव्यांदा मात्र त्यांचा पराभव झाला. त्यामुळे केंद्रात रेल्वे खात्याचा कारभार दुसऱ्यांदा स्वीकारण्याची त्यांची संधी हुकली. मात्र राजूर येथे त्यांनी मंजूर केलेली टॉयट्रेन प्रत्यक्षात सुरू करत आपला शब्द पुर्ण केला.

बच्चे कंपनीच्या टॉय ट्रेनमधून सफरीचा आनंद लुटत ते अक्षरशः लहान मुल झाल्याचे दिसून आले. राजुर हे गणपतीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ असून येथे वर्षभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक व भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

भोकरदन तालुक्यातील प्रसिद्ध असणारे श्रीक्षेत्र राजूरला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक व पर्यटन विभागाकडून नुकताच अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे हे श्री क्षेत्र राजुर संस्थानचे सचिव देखील आहेत.

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत श्री क्षेत्र राजूर येथे बाल उद्यान आणि विविध विकास कामाकरीता 10 कोटी रुपयांचा निधी रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नामुळे प्राप्त झाला होता. राजूर हे गाव रावसाहेब दानवे यांनी आधीच राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले आहे.

राजुर हे गाव खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत त्यांनी दत्तक घेतले होते. राजुर येथील ग्रामपंचायत देखील भाजपच्याच ताब्यात आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना व बच्चे कंपनीला या परिसरात काही निवांत क्षण घालवता यावे यासाठी उद्यान आणि त्यात टॉय ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दानवे यांनी या कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच टॉय ट्रेनचे काम पुर्ण होऊन ती बच्चे कंपनीला सफर घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. रावसाहेब दानवे आणि राजूर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी या सफरीचा पहिला आनंद लुटला. हे पाहून ‘दिल तो बच्चा है जी’, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT