Dhananjay Munde
Dhananjay Munde 
मराठवाडा

'त्या दिवसापासून माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली...' धनंजय मुंडेंनी दिला गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

सरकारनामा ब्युरो

परळी : ''गोपीनाथ मुंडे साहेबांनी माझे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्याशी माझ्या जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारीसाठी अक्षरशः वाद घातला. ज्या पट्टीवडगाव गटातून ते स्वत: १९७८ साली लढले होतेय त्याच गटातून त्यांनी मला उमेदवारी दिली आणि मी विजयी झालो. त्याच दिवसापासून माझ्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Dhananjay Munde latest political news)

आज गोपीनाथगड (पांगरी) ता. परळी येथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावरील स्मृतिस्थळी अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते. ''गोपीनाथराव मुंडे आज हयात असते तर मागच्या पाच-सहा वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जे बदल घडले, ते कदाचित घडले नसते. राजकारणातील सौहार्द कायम टिकून राहिले असते. असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

मी गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत अनेक वर्ष सावलीसारखा सोबत राहिलो, त्यांच्या संघर्षाच्या काळात देखील मी क्षणोक्षणी सोबत होतो. गोपीनाथ मुंडे हे सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व होते. ऊस तोड कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी संघर्ष केला. बीड जिल्ह्यातील सर्व सामान्य माणसाची प्रगती, ऊस तोड कामगारांचे कल्याण हे त्यांचे स्वप्न उराशी बाळगूनच मी काम करतो आहे. ऊसतोड कामगार महामंडळाची अधिकृत स्थापना देखील झाली असून, आता कामगारांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रगतीचे स्वप्न देखील पूर्ण करणार असल्याचा निर्धार यावेळी धनंजय मुंडेंनी व्यक्त केला.

याप्रसंगी माजी आ. अमरसिंह पंडित, युवक नेते अजय मुंडे, अभय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण राव पौळ, मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान नाना मुंडे, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, रा. कॉ. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माणिकभाऊ फड, चंद्रकांत कराड, अय्युब भाई पठाण, चंद्रकांत फड, गोविंद कराड यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान, आज सकाळीच धनंजय मुंडे यांनी 'अप्पा आजही तुमचा आवाज माझ्या कानात घुमतो' अशा आशयाचे ट्विट करून गोपीनाथ मुंडेंना आदरांजली अर्पण केली. याबद्दल माध्यमांनी विचारले असता, धनंजय मुंडे म्हणाले, 'होय, सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नांची उकल करून त्यांना न्याय देणारा मुंडे साहेबांचा आवाज होता. आम्हाला त्यांनी तीच शिकवण दिली व तीच शिकवण आम्ही अंगीकृत केली. आजही सर्व सामान्य माणसाच्या न्यायासाठीचा त्यांचा तो आवाज माझ्या कानात घुमतो...' अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT