हिंगोलीत दोन युतीतील आमदार बांगर आणि मुटकुळे यांच्यात उघड संघर्ष झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
एकमेकांवर खालच्या पातळीवर आरोप-प्रत्यारोप, सभागृहासह सार्वजनिक कार्यक्रमांतून तीव्र वक्तव्ये.
या वादामुळे हिंगोलीतील कार्यकर्त्यांमध्येही तणाव.
Hingoli News : राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना आणि भाजप हे दोन घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. मात्र प्रचार सभांमधून एकमेकांची उणीदुणी काढताना दोघेही मुक्तपणे तुटून पडले आहेत. हिंगोलीचे भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे आणि कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे.
नगर परिषदेच्या सत्तेसाठी एकमेकांची अंडीपिल्ली बाहेर काढण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली आहे. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याकडून हिंगोलीला मटका, जुगार, अवैध धंदे आणि वाळू माफियांपासून मुक्त करायचे असेल तर नगर परिषदेची सत्ता आमच्या हाती द्या, असे आवाहन केले जात आहे. संतोष बांगर हा हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक असल्याची विखारी टीकाही मुटकुळे यांच्याकडून करण्यात आली. दुसरीकडे आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपवर सत्तेचा दुरुपयोग आणि दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला. भाजपच्या स्थानिक आमदाराने आपल्या घरी 100 पोलीस पाठवले, असा खळबळजनक दावा करत बांगर यांनी मुटकुळे यांच्यावर हल्लाबोल केला.
हिंगोली नगर परिषदेमध्ये संतोष बांगर यांच्या भावजय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. याशिवाय इथे बांगर यांनी स्वबळावर शिवसेनेचे पॅनल उभे केले आहे. त्यांची थेट लढत भाजपच्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याशी असून दोघे एकमेकांवर अक्षरश: तुटून पडल्याचे चित्र आहे. राज्यात महायुती आणि या युतीतले शिवसेना आणि भाजप हे घटक पक्ष आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली नसली तरी एकमेकांवर टीका करताना संयम बाळगण्याचे भान या दोन्ही पक्षांना उरलेले नाही.
विकासाचे मुद्दे सोडून वैयक्तिक चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील या दोन आमदारांकडून सुरू आहे. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आधीच तानातानी सुरू आहे. त्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत नेते एकमेकांचे वाभाडे काढत असल्याने याचा परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकीतील युतीवर होणार आहे.
शिवसेना-भाजप एकमेकांवर तुटून पडले असले तरी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः अजित पवार यांनी मित्र पक्षावर निवडणुकीत विरोधक असले तरी टोकाची टीका करणे टाळल्याचे दिसून आले आहे. अजित पवार यांनी नुकताच मराठवाड्याच्या बीड, नांदेड, परभणी जिल्ह्याचा दौरा करत प्रचार सभा घेतल्या. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप किंवा शिंदेंची शिवसेना अशी लढत असताना अजित पवारांनी विकासाचा मुद्दा प्रामुख्याने पुढे करत मतदारांना साद घातलेली दिसून आले.
याउलट महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपने नगरपरिषदेच्या निवडणुकीत मात्र आपण राज्याच्या सत्तेत मित्र आहोत हे विसरून एकमेकांवर टीका, आरोप प्रत्यारोपाची खालची पातळी गाठल्याचे चित्र आहे. आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीचे भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या सांगण्यावरून आपल्या घरी सकाळी सकाळी शंभर पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. मुलं, बाळं आई, पत्नी घरात झोपलेले असताना सर्च वॉरंट दाखवत झाडाझडती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. माझ्यासारख्या आमदारावर जर अशी वेळ येत असेल तर मग सर्वसामान्यांचे काय? असा सवाल करत संतोष बांगर यांनी भाजपवर निशाणा साधला.
1. हिंगोलीत कोणत्या दोन आमदारांमध्ये वाद झाला?
बांगर आणि मुटकुळे या आमदारांमध्ये जोरदार संघर्ष झाला.
2. वादाचे कारण काय होते?
एकमेकांवरील आरोप व मतभिन्नतेमुळे राजकीय पातळीवरून व्यक्तिगत टीका झाली.
3. हा वाद कुठे समोर आला?
सार्वजनिक कार्यक्रम आणि माध्यमांमधील वक्तव्यांमध्ये हा संघर्ष भडकला.
4. युतीवर याचा काय परिणाम होऊ शकतो?
युतीत तणाव वाढून फुटीचे संकेत ठळक होण्याची शक्यता.
5. स्थानिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया काय आहे?
दोन्ही बाजूंचे समर्थक आक्रमक, जिल्ह्यात वातावरण तापलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.