Bhaskar Patil Khatgaonkar
Bhaskar Patil Khatgaonkar Sarkarnama
मराठवाडा

एकाधिकारशाहीचा आरोप करणारे खतगांवकर पक्षाशी किती एकनिष्ठ होते?

जगदीश पानसरे

नांदेड ः माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपचा राजीनामा देत पुन्हा काॅंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीतच खतगाकरांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला धक्का बसला आहे. परंतु पक्ष सोडतांना खतगावकर यांनी भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप केला, त्याला कंटाळूनच आपण पक्ष सोडत असल्याचे खतगांवकर यांनी जाहीरपणे सांगितले.

चिखलीकर यांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळून लावत एकाधिकारशाहीचा आरोप करणारे खतगावकर स्वतः पक्षाशी किती एकनिष्ठ होते? असा सवाल करत पलटवार केला आहे. ज्यांना जायचे होते ते गेले, तरीही सुभाष साबणे हेच जिंकणार, असा दावा देखील चिखलीकरांनी केला. खतगावंकरांनी भाजपला रामराम केल्यानंतर चिखलीकरांनी आज नांदेडात पत्रकार परिषद घेत त्यांच्या आरोपांना उत्तर दिले.

चिखलीकर म्हणाले, भाजपमध्ये एकाधिकारशाही चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष विकासाचे राजकारण करतो. परंतु पक्ष सोडतांना काही तरी निमित्त शोधावे लागते आणि चिखलीकरांनी माझ्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करत ते शोधले आहे. पण माझ्यावर आरोप करण्याआधी भाजपमध्ये असतांना आपण पक्षाशी किती एकनिष्ठ होतात, राहायचे एका पक्षात आणि काम करायचे दुसऱ्या पक्षाचे हे योग्य होते का? असे म्हणत चिखलीकरांनी खतगावकरांच्या निष्ठेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता, आमच्या कोअर कमिटीने साबणे यांच्या नावाची शिफारस वरिष्ठांकडे केली होती. त्यानंतर साबणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यामुळे खतगावकर यांच्या आरोपात तथ्य नाही. जिल्ह्याचा खासदार म्हणून मी एखादी शिफारस केली आणि पक्षश्रेष्ठींनी ती मान्य केली तर यात गैर काय? उलट तो माझा मोठेपणाच आहे, असं सागांयला देखील चिखलीकर विसरले नाही.

काॅंग्रेस सोडतांनाची क्लिप पहा

खतगांवकरांनी जेव्हा काॅंग्रेस पक्ष सोडला होता तेव्हा त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांवर काय आरोप केले होते? याची व्हिडिओ क्लीप तुम्हीच पहा, असे आवाहन चिखलीकरांनी पत्रकारांनाच केले. पक्ष सोडतांना असे काही तरी निमित्त शोधावे लागते, याचा पुनरुच्चार देखील चिखलीकरांनी केला.

भाजपला देगलूर-बिलोली पोटनिवडणूकीसाठी उमेदवारच मिळत नव्हता, आरोपावर आमच्याकडे १२ इच्छूक होते, उलट काॅंग्रेसकडेच जितेश अंतापूरकर यांच्या शिवाय दुसरा कुणीच उमेदवार नव्हता, असा दावा चिखलीकरांनी केला.

राहिला प्रश्न उपऱ्यांचा तर अनेक पक्षात लोक येतात, जातात, सगळ्याच पक्षात हे चालंत, त्यामुळे उपऱ्याची भाषा कुणी नाही केली तरच बरं होईल. ज्यांना जायचे होते ते पक्ष सोडून गेलेले आहे, तरी देखील सुभाष साबणे हेच जिंकणार, असा विश्वास देखील चिखलीकरांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT