तुकाराम मुंढे यांची ८ दिवसांत पुन्हा बदली झाल्याने वाद निर्माण
वारंवार बदल्यांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित
सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा वाढली
Mumbai News : कडक शिस्त आणि धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. मागील २१ वर्षांच्या कारकीर्दीत ही त्यांची २५ वी बदली आहे. तर दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात त्यांची बदली करण्यात आली आहे. यावरून राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून समाज माध्यमावर यावरून संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान त्यांची बदली रद्द करावी, म्हणून नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी निदर्शने केली आहेत. या बदलीचे पडसाद आता राजकीय आणि सामाजिक स्तरावर उमटू लागले असतानाच भाजपचे विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मुंढेंबाबत केलेल्या एका अजब विधानाची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी नांदेड दौऱ्यात ‘मला तुकाराम महाराजांबद्दल माहित आहे. नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही,’ असं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची २५ वी बदली झाली. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना मुंढे यांनी अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली. तसेच विभागातील दीर्घकाळ चालत आलेल्या अनियमितता उघडकीस आणल्या. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नियंत्रण आणत शिस्त लावली.
तसेच राजकीय दबावाला बळी न पडता निश्चित धोरण राबवत दिव्यांगांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या इतर विभागातील कर्मचाऱ्यांना रडारवर घेतलं. यामुळे शिक्षण विभागासह इतर खात्यांचे धाबे दणाणले होते. काहीच दिवसांत अनेकांच्या दांड्या पडल्या असल्या अशी शक्यता व्यक्त केली जात होती. तोच दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या सचिव पदी बदली करण्यात आली.
यावरून आता तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली का केली जाते? असा प्रश्न करत मुंढे यांची बदली झाल्याने दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. मुंढे यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. तसेच वारंवार होणाऱ्या या बदल्यांमुळे सोशल मीडियावर सरकारच्या निर्णयाविरोधात टीका होत आहे. अशातच विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये असणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर भाष्य केले. मुंढे यांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला होता.
त्यावर उत्तर जेताना खोत यांनी "माझं घराणं वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे संत तुकाराम महाराजांबाबत मला माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते, पण नवीन युगातील तुकारामांबाबत मला फारशी माहिती नाही", असे उत्तर त्यांनी दिले.
पण प्रशासकीय वर्तुळात तुकाराम मुंढे यांची कार्यशैली अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कठोर म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. या वारंवार होणाऱ्या बदल्यांवरून सरकारवर हल्ला होत आहे. तर एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलं आहे. त्यांची पाठ थोपटली होती. पण त्यांचेच आमदार मात्र आपल्याला 'ते मला माहिती नाहीत' असे म्हणत विषय टाळत असल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
1. तुकाराम मुंढे यांची बदली किती वेळा झाली आहे?
त्यांच्या 21 वर्षांच्या कारकीर्दीत ही 25 वी बदली आहे
2. त्यांची अलीकडील बदली कशासाठी चर्चेत आहे?
फक्त ८ दिवसांत पुन्हा बदली झाल्यामुळे
3. सदाभाऊ खोत यांनी काय प्रतिक्रिया दिली?
त्यांनी ‘नवीन युगातील तुकारामांबाबत माहिती नाही’ असे म्हटले
4. या प्रकरणावर लोकांची प्रतिक्रिया काय आहे?
सोशल मीडियावर सरकारवर टीका होत आहे
5. या वादाचा परिणाम काय होऊ शकतो?
प्रशासकीय निर्णयांवर आणि राजकीय चर्चांवर परिणाम होऊ शकतो
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.