Mla Jayant Patil, News Mumbai
Mla Jayant Patil, News Mumbai Sarkarnama
मराठवाडा

Jayant Patil News : समुद्रात शक्य नसेल तर शिवाजी महाराजांचे स्मारक `गेटवे ऑफ इंडिया`समोरील खडकावर करा..

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parisad : छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु दोनवेळा भुमीपूजन झाले तरी या स्मारकाचे काम पुढे सरकू शकलेले नाही. सरकारकडून सीआरझेडच्या परवानगीचे कारण पुढे केले जाते. १ हजार कोटींच्या या स्मारकांचे काम होणार की नाही? त्यासाठी दहा वर्ष लागली तर काय करणार? असा सवाल करतांनाच शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हे स्मारक `गेट वे ऑफ इंडिया`समोरील कासाच्या खडकावर, जिथे रामदास बोट बुडाली होती तिथे करण्याची मागणी केली आहे.

अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होतांना त्यांनी या मुद्द्याला हात घातला. जयंत पाटील म्हणाले, माझी अपेक्षा होती की, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल सीआरझेडचे कारण तुम्ही अर्थसंकल्पात (Budget Session) सांगणार नाही. दोनवेळा उद्घाटन झाले, दुसऱ्यावेळी करण्याची गरज नव्हती. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर परत उद्गाटन केले. त्याचे नियोजन नव्हते, घाई करण्याची गरज नव्हती.

असे कार्यक्रम करतांना नियोजन पाहिजे, पण माझी मागणी वेगळी आहे. सीआरझेडच्या परवानग्या ह्या आधीच मिळाल्या पाहिजेत. त्यानंतरच कुठलेही काम सुरू झाले पाहिजे. आतापर्यंत दोन कोटी समारंभावर खर्च झाला. पण प्रत्यक्षात कशाचाच पत्ता नाही. यापुढे शासकीय काम करतांना सीआरझेडची परवानगी आधी घेतली पाहिजे. कायदा केला पाहिजे, विधानसभा आणि केंद्राला तसा अधिकार आहे.

त्याआधारे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिले पाहिजेत, बांधकामाचे नियम बदलले पाहिजेत. १ हजार कोटींची तरतूद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांसाठी करण्यात आली आहे. ते पुढच्या दहा वर्षात तरी होणार का? कधी होणार हा खरा प्रश्न आहे. बजेटमध्ये याची चर्चा झाली पाहिजे होती. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणे शक्य नसेल तर `गेट वे ऑफ इंडिया` समोर असलेल्या काशाचा खडकावर हे स्मारक करा. रामदास बोट बुडाली तिथे स्मारक करा, अशी मी मागणी जयंत पाटील यांनी केली.

कोरोना काळात ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जावरील व्याज भरले नाही, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना व्याज माफी करावी, किंवा बॅंकांना सांगावे, बॅंका ते व्याज भरतील आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. बॅंकाचीही कर्ज वसुल होईल असेही ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा, सहा महिने बोटी समुद्रात जावू शकल्या नाहीत, मच्छीमारीचा व्यवसाय बुडाला. मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT