Central Minister Nitin Gadkari
Central Minister Nitin Gadkari Sarkarnama
मराठवाडा

जल संरक्षणाची कामे हाती घेतली तर महाराष्ट्रात कधीच दुष्काळ राहणार नाही

जगदीश पानसरे

लातूर ः मला आठवत लातूरमध्ये गेल्यावेळी पाण्याची तीव्र टंचाई होती, तेव्हा रेल्वेने पाणी आणावे लागले होते. मुळात आपल्याकडे पावसाचे प्रमाण कमी नाही, पण पडलेल्या पावसाच्या पाण्यापैकी आपण किती साठवतो हे महत्वाचे आहे. १५ टक्यांपेक्षा जास्त पावसाचे पाणी आपण साठवू शकत नसल्यानेच मराठवाडा आणि राज्यात दृष्काळाची परिस्थीती निर्माण होते. त्यामुळे माझी लातूर आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींना विनंती आहे, की त्यांनी मोठ्या प्रमाणात जल संरक्षणाचे काम हाती घ्यावे.

या भागातील नदी,नाले, ओढे, तलाव यातील गाळ, मुरूम याचा उपसा करून खोलीकरण वाढवावे, जेणेकरून पाण्याची साठवण क्षमता वाढून सिंचनाचे क्षेत्र साठे ते ६५ टक्यांनी वाढेल आणि पुन्हा कधी रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येणार नाही, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

लातूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग व पुलांच्या कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी देशभरात सुरू असलेल्या महामार्ग, उड्डाणपूल, लिंक रोडची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

तसेच जल संरक्षणाचे फायदे ओळखून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन देखील केले. गडकरी म्हणाले, ज्या देशातील रस्ते चांगले असतात, त्या देशाचा सर्वांगीण विकास होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जाॅन केडी यांचे एक वाक्य मी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना माझ्या कार्यालयात लावून ठेवले होते. त्यामुळे आपण देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करत आहोत.

मराठवाड्यात २० हजार कोटींची कामे

देशातील तीर्थक्षेत्र, पालखी मार्गा प्रमाणेच बिहार आणि उत्तर प्रदेशात बौद्ध सर्किट, सुरत ते हैदराबाद ४० हजार कोटींचा ग्रीन हायवे, आयोध्ये पासून नेपाळपर्यंत आणि राम-सीता ज्या ज्या मार्गाने गेले होते त्या मार्गावर राम-जानकी मार्ग आपण बांधतो आहोत. महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात आपण राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल उभारतो आहोत. मराठवाड्यातच सध्या २० हजार कोटींची कामे सुरू आहेत, त्यात एकट्या लातूरात ५ हजार कोटी दिले आहेत.

भविष्यात देखील दोन-तीन हजार कोटी रुपये लातूरसाठी देण्याची आपली तयारी असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. लातूर टेंभुर्णी, आणि लातूर लिंक रोडला जोडणारा मार्ग देखील आपण पुर्ण करून देऊ, असे आश्वासन गडकरी यांनी लातूरकरांना दिले. लातूरमध्ये असलेल्या साखर कारखान्यांचा उपयोग हा इथेनाॅलच्या निर्मितीसाठी करा, असे आवाहन देखील गडकरी यांनी उपस्थीत लोकप्रतिनिधींना आवर्जून केले.

शंभर टक्के इथेनाॅलवर चालणाऱ्या कार, दुचाकी आपण तयार करत आहोत. त्यामुळे सगळीकडे शंभर टक्के इथेनाॅलचे पंप उभे राहणार आहेत. या शिवाय तुमच्याकडे असलेल्या ब्राॅडगेजचा वापर ब्राॅडगेज मेट्रोसाठी कसा करता येईल याचा अभ्यास करा. मी नागपूरात आठ डब्यांची इलेक्ट्रीक ब्राॅडगेज मेट्रो सुरू करतो आहे.

तिचा वेग ताशी १४० किलोमीटर एवढा असणार आहे. शिवाय या मेट्रोचे भाडे हे बस इतके स्वस्त असणार आहे. त्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा देखील वाचेल. तुम्ही तसा प्रयत्न करा, माझ्याकडे प्रस्ताव घेऊन या, मी सगळी मदत करेन, असे आश्वासन देखील गडकरी यांनी उपस्थितांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT