Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray
Mp Imtiaz Jalil, Raj Thackeray Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून पोलिसांनी राज ठाकरेंवर सोपी कलमं लावली ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करतांना पोलिसांनी त्यांना जामीन मिळावीत अशी कलमं लावली आहेत. राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करणार म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता, मग राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे विधान कोणत्या कलमांत मोडते ? की मग मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावावर राजद्रोहाचा गुन्हा कसा नोंदवायचा म्हणून सोपी कलमं लावली, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे च्या जाहीर सभेनंतर पोलिसांनी आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. (Aurangabad) गुन्हा दाखल करतांना पोलिसांनी जी कलम लावली आहे ती सगळी अजामीनपात्र अशी आहेत. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. राज ठाकरे यांच्यावर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून कलम १५३ अ अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

पत्रकारांशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी एकूणच पोलिसांच्या कारवाई आणि गुन्हा दाखल करतांना लावलेल्या कलमांवरच संशय व्यक्त केला. इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरे यांचा अटकेपासून बचाव व्हावा, त्यांना जामीन मिळावा याची काळजी पोलिसांनी गुन्हा दाखल करतांना घेतल्याचे दिसते. राज ठाकरे यांनी आपल्या सभेत जी भाषा वापरली ती दोन समाजात तेढ निर्माण करणारी नव्हती का?

भाषण सुरू असतांना अजान सुरू होती तेव्हा पोलिसांना आताच्या आता जाऊन त्यांच्या तोंडात बोळा कोंबा सागणारे हे कोण? अजान मशिदीतील मौलवी देत असतात, त्यांच्या तोंडात बोळा कोंबणारे तुम्ही कोण ? रमजान ईदच्या दिवशी मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मशिदीसमोरच हनुमान चालीसा लावण्याची भाषा पोलिसांना साधी वाटते का ? मुळात राज ठाकरे यांच्यावर सभा झाली त्याच दिवशी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण पोलिस म्हणे आम्ही अभ्यास करत होतो.

तीन दिवस अभ्यास करून पोलिसांनी गुन्हा दाखल करतांना राज ठाकरे यांना जामीन मिळेल अशी सोपी कलम का लावली? कोणाच्या दबावाखाली पोलिसांनी हे काम केले, असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला. राणा दामप्त्यांनी मुंबईत जे केले त्याचे मी समर्थन अजिबात करणार नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणणे जर देशद्रोहाचा गुन्हा ठरत असेल, तर मग राज ठाकरे यांनी भाषणात वापरलेली भाषा काय होती ? त्यांच्यावर का राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही.

मुख्यमंत्र्यांना आपल्या भावावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करावा, असा प्रश्न पडला म्हणून राज ठाकरे यांच्यावर जामीन मिळणारी कलम लावली का ? असा प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी विचारला. माझ्या तिरंगा यात्रेच्या वेळी मला पोलिसांनी तारीख बदलण्यास सांगितली, आम्ही ती बदलली देखील. मग रमजानसह अन्य महत्वाचे सण असतांना राज ठाकरे यांना सभा नंतर घेण्यास का सांगितले नाही? असा सवाल करत इम्तियाज जलील यांनी पोलिसांच्या कारवाईवरच बोट ठेवले आहे.

राज ठाकरेंवर काय कारवाई करायची हे सरकारमध्ये बसलेल्या प्रमुख नेत्यांनी ठरवले आणि मग साधी कलमं लावून गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादीला भविष्यात मनसे सोबत युती करायची आहे का ? असा टोला लगावतांनाच राज ठाकरे यांच्यावर देखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून कलम १५३ अ अंतर्गत कारवाई करा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT