State Finance Minister Dr. Karad-Mp Imtiaz Jalil News
State Finance Minister Dr. Karad-Mp Imtiaz Jalil News Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : धनदांडग्यांना कर्जाची खैरात वाटायला सरकारी बॅंका कराडांची जहागीर आहे का ?

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आपल्या राजकीय स्वार्थासाठी धनदांडगे, मित्र आणि उद्योगपतींना कर्जाची खैरात वाटायला सरकारी बॅंका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagawat Karad) किंवा त्यांच्या भाजप पक्षाची जहागीर आहेत का? असा संतप्त सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz jalil) यांनी केला. राष्ट्रीयकृत बॅंकाच्या वतीने आज २९०० कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या पुढाकाराने शहरात कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो कोटींचे कर्ज वाटप करण्यात येत आहे. परंतु या कर्ज वाटप मेळाव्याला महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्पलाॅईज फेडरेशनसह खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. (Aurangabad) आपल्या राजकीय स्वार्थासाठी सरकारी बॅंकांच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून ही कर्ज वाटली जात आहेत. जी भविष्यात थकीत किंवा बुडीत ठरू शकतात. त्यामुळे खऱ्या गरजूंना कर्जपुरवठा न होता, राजकीय नेत्यांच्या व त्यांच्या पक्षांना मदत करणाऱ्या धनदांडग्यांनाच तो केला जातो, असा आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.

इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्पलाॅईज फेडरेशनच्या निवेदनाचा दाखला देत भाजप व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्यावर टीका केली आहे. आपली खुर्ची आणि राजकीय अजेंडा राबवण्यासाठी केंद्रातील सरकार व त्यांचे मंत्री बॅंकावर दबाव आणत असल्याचा आरोप देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केला.

इम्तियाज जलील म्हणाले, सरकारी बॅंकाचे खाजगीकरण करून त्या मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या देशातील विमानतळे, पोर्ट, रेल्वे, बॅंका कोण खरेदी करतयं हे नव्याने सांगायची गरज नाही. आधी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाचा व त्यामधील पैशाचा वापर हा आपल्या राजकीय स्वार्थासाठी करायचा. मग तीच कर्ज थकीत झाली की खाजगीकरण करण्यास भागा पाडायचे हाच प्रयत्न केंद्रातील मोदी सरकारचा राहिला आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री कराड यांनी आयोजित केलेला हा कर्ज मेळावा देखील त्याचाच एक भाग आहे.

पण बॅंकाच्या अधिकाऱ्यांनी जनतेचे हित लक्षात घेऊन काम केले पाहिजे. मोदी किंवा कराड यांची खुर्ची वाचवण्याची जबाबदारी बॅंकांच्या अधिकाऱ्यांची नाही, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी लगावला. देशातील शिक्षणासाठी कर्ज मिळत नाही, पण धनदांडग्यांना मात्र बॅंकांची दारं नेहमी खुली असतात, असा आरोप करत इम्तियाज जलील यांनी या कर्ज मेळाव्यावर टीका केली. तर अशा पद्धतीने वाटली जाणारी कर्ज परत येत नाहीत, असा आरोप करत बॅंक एम्पलाॅईज फेडरेशनने देखील कराडाच्या पुढाकारातून घेतल्या जात असलेल्या कर्ज मेळाव्याला विरोध दर्शवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT