Dr. Kalyan Kale
Dr. Kalyan Kale  Sarkarnama
मराठवाडा

Jalna Lok Sabha Constituency : दानवेंच्या पराभवानंतर जालन्यात 'स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा'...

Tushar Patil

Bhokardan Political News : मराठवाड्यातील धक्कादायक निकालापैकी एक असलेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघात सलग पाच वेळा निवडून आलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर दानवे यांच्या भोकरदनमध्ये लागेल्या एका बॅनरची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसते आहे.

हे बॅनर भोकरदन शहरातील प्रमुख चौकात लावण्यात आले असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी ते लावले आहे. महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांना विजयाच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर असले तरी यावर नमूद करण्यात आलेल्या मजकुरातून रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

कल्याण काळे यांना विजयाच्या शुभेच्छा देतानाच या बॅनरवर भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा, असा टोला लगावण्यात आला आहे. सध्या या बॅनरची तालुक्यात चांगलीच चर्चा होताना दिसते आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपच्या वतीने संपुर्ण देशात काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचा भोकरदनमध्ये विरोध केला होता.

शेतकऱ्यांच्या कापसाला, सोयाबीनला भाव नाही, असा आरोप करत राहुल देशमुख यांनी हा विकसित भारत रथ भोकरदन तालुक्यात रोखत त्यावर कापूस फेकत भाजप सरकारचा निषेध केला होता. या शिवाय याच रथावरील बॅनरवर करण्यात आलेल्या मोदी सरकार या शब्दातील मोदी नावावर भारत असा उल्लेख करणारे स्टीकर चिटकवले होते.

या प्रकरणी नंतर राहुल देशमुख यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी सुडापोटी हा गुन्हा दाखल करायला लावल्या आरोप त्यावेळी करण्यात आला होता. रावसाहेब दानवे यांच्या एकाधिकारशाही तून भोकरदन-जाफ्राबाद तालुक्यातील जनतेला आता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले, असेच या बॅनरमधून राहुल देशमुख यांनी सुचवल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सलग सहाव्यांदा लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या रावसाहेब दानवे यांना काँग्रेसच्या कल्याण काळे (Congress) यांनी तब्बल 1 लाख 9 हजार मतांनी पराभव केला. गावचे सरपंच, पंचायत समिती सभापती, दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, केंद्रात दोन वेळा राज्यमंत्री राहिलेल्या दानवे यांचा पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातो. चाळीस वर्ष दानवे यांनी जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व गाजवले. कालच्या पराभवाने त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT