Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar
Mla Kailas Gorantyal-Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

अर्जुन खोतकर-गोरंट्याल वाद भडकला : २०२४ चा सामना आतापासूनच रंगलाय

सरकारनामा ब्युरो

जालना : महाविद्यालयापासून एकमेकांचे मित्र असलेले शिवसेनेचे माजी मंत्री अर्जून खोतकर आणि काॅंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल सध्या एकमेकांचे राजकीय शत्रू बनले आहेत. (Jalna) जालना जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या दोन नेत्यांमधील संघर्ष नवा नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी भाजपच्या मदतीने शिवसेनेच्या खोतकरांचा पराभव केल्याचे बोलले जाते.

राजकारणात पाच वर्ष घरी बसावे लागणे यापेक्षा दुसरे दुःख कुठलेच नसते. तर कैलास गोरंट्याल यांचा राजकीय वनवास संपल्यानंतर त्यांच्या नशिबाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि काॅंग्रेस सत्तेतील एक महत्वाचा पक्ष बनला.(Shivsena) शिवसेना आणि काॅंग्रेस (Congress) राज्याच्या सत्तेत मांडील मांडी लावून बसलेले असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांवर कुरघोडी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी खोतकर-गोरंट्याल नेहमीच एकमेकांना भिडतांना दिसले.

नगर परिषदेवर गोरंट्याल यांची सत्ता आहे, तर कृषी उत्पन्न बाजार समितीत आजही खोतकरांचाच शब्द चालतो. परंतु खोतकर यांना आता पुन्हा राजकाराणात उभारी घेऊ द्यायची नाही, अशी खेळी गोरंट्याल आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुरू केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रत्येक उद्घाटन, लोकार्पण कार्यक्रमाला दानवे यांची हजेरी असते. तर केंद्राकडून राबवण्यात येणाऱ्या योजना, रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभ कार्यक्रमात गोरंट्याल दानवेंच्या शेजारी बसलेले गेल्या दीड-दोन वर्षात सातत्याने पहायला मिळाले.

केंद्रातील सत्ता आणि ईडीच्या माध्यमातून दानवे खोतकरांचा वचपा काढत आहेत. तर दानवेंशी जवळीक साधून शहराच्या व नगरपालिकेच्या राजकारणात खोतकरांचा आपल्याला त्रास होऊ नये याची काळजी गोरंट्याल यांच्याकडून घेतली जात आहे. त्यामुळे अर्जून खोतकर सध्या अडचणीत सापडले आहेत. मध्यंतरी झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर खोतकर काहीसे नरमले अशी देखील चर्चा होती.

परंतु आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, विधानभा निवडणुका पाहता आपण अजूनही मैदानात आहोत हे खोतकर आणि त्यांच्या समर्थकांनी दाखवून दिले आहे. आज विविध कार्यकारी सोसायटीच्या जिल्ह्यातील निवडणुकीत खोतकर-गोरंट्याल समर्थक एकमेकांना भिडले. या दोन नेत्यांमध्ये देखील बाचाबाची झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे भविष्यात जालन्याचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचा ट्रेलर या निमित्ताने पहायला मिळाला.

गोरंट्याल यांच्या पाठीशी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी शक्ती उभी केली आहे, तर खोतकरांना शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा पाठिंबा आहे. जल आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ही बाब प्रकर्षणाने समोर आली. दानवे यांनी सत्तार यांचा सिल्लोडचा औरंगजेब असा उल्लेख केला, तर समोरासमोर बोलण्याची हिमंत नाही म्हणून खोतकरांनी हा औरंगजेब आपल्या अंगावर सोडल्याचा आरोप दानवे यांनी केला होता.

गेल्या लोकसभा निवडणुकीत खोतकरांना दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवण्यास भाग पाडण्याचे सत्तार यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. पण युती झाल्यामुळे खोतकरांना माघार घ्यावी लागली. दानवेंनी दोस्ती निभावण्याच्या आणाभाका घेतल्या, पण विधानसभेत खोतकरांच्या पाठीत खंजीर खुपसला हे पराभवानंतर सिद्ध झाले. सत्तारांनी पुन्हा अर्जूनाच्या बाणाने दानवेंचा राजकीय वध करण्याची भाषा सुरू केली आहे.

पण सत्तार-दानवे यांची मिलिभगत संपुर्ण जिल्ह्याला माहित असल्यामुळे खोतकर त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवतील हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. एकंदरित दानवे आणि सत्तार हे अनुक्रमे गोरंट्याल आणि खोतकरांचा खांदा वापरून आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत, असेच सध्या तरी दिसते. यात गोरंट्याल यांना नगरपरिषदेतील सत्ता आणि आमदारकी टिकवायची आहे, तर खोतकरांना राजकारणात पुन्हा कम बॅक करायचे आहे. वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT