<div class="paragraphs"><p>Munde-Kshirsagar-Patil</p></div>

Munde-Kshirsagar-Patil

 

Sarkarnama

मराठवाडा

बीडमध्ये पंकजा-धनंजय मुंडेसह जयदत्त क्षीरसागरांची प्रतिष्ठा पणाला

सरकारनामा ब्युरो

बीड ः जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पुन्हा एकदा पणाला लागली आहे. (Dhnanjay Munde) निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्यात या दोन बहिण-भावांना एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. (Marathwada) आता मतदार कुणावर विश्वास टाकतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजपकडून पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यात प्रचाराची धुरा सांभाळली तर महाविकास आघाडीकडून धनंजय मुंडे यांनीच किल्ला लढवला. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना या पाचही नगरपंचायतीमध्ये पहायला मिळणार आहे. या शिवाय माजी मंत्री व शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी देखील शिरुर नगरपंचायतीत जोर लावला आहे.

तर नुकत्याच राज्यसभेवर निवडून गेलेल्या काॅंग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी केज नगरपंचायत ताब्यात घेण्यासाठी आपली शक्तीपणाला लावल्याचे दिसून आले आहे. या शिवाय स्थानिक पातळीवर भाजपचे आमदार सुरेश धस, भीमराव धोंडे आदींनी देखील प्रचारात रंगत आणली.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या नगरपंचायत निवडणुकीत मतदार कौल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने देणार की मग विरोधात यावर बरेच काही अवलंबून आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण हे मुद्दे तापलेले आहेत. ही दोन्ही आरक्षणे रद्द होण्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने केली गेली.

तर केंद्राने याला राज्यातील तीन पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले आहे. नगर पंचायत निवडणूकीत स्थानिक मुद्दे प्रभावी ठरणार असले तरी आरक्षणाचा प्रभाव मतदारांवर राहणारच आहे. बीड जिल्ह्याच्या राजकारणात भाऊबंदकी नवी नाही. गेल्या दोन अडीच वर्षात पालकमंत्री धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना वारंवार पहायला मिळाला.

कोरोना काळात रेमडेसिव्हरचा झालेला काळाबाजार, लसींचा तुटवडा, औषधींमधील घोळ आणि आता जिल्ह्यात बोकाळलेला दहशतवाद, माफियाराज यावरून देखील पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना वारंवार लक्ष्य केले होते. तर त्याला धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. या सगळ्यामध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर मात्र शांत दिसले.

नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसून आले. काॅंग्रेस पक्षाने पुन्हा एकदा आपल्यावर विश्वास दाखवत राज्यसभेत पाठवल्याने खासदार रजनी पाटील यांनी देखील नगरपंचायतीत विजय मिळवून पक्षाला भेट देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एकंदरित पाच नगरपंचायतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT