Kalamnuri APMC News
Kalamnuri APMC News Sarkarnama
मराठवाडा

Kalamnuri APMC News : बाद मतांमुळे झाला आमदार बांगरांचा `करेक्ट कार्यक्रम`..

सरकारनामा ब्युरो

Hingoli District : कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Kalamnuri APMC News) झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये विविध कारणास्तव बाद झालेल्या मतांची संख्या मोठी आहे. यामध्येही काही मतदारांनी मतपत्रिकेवर मतदानाची फुली मारण्याऐवजी स्वतःचे अंगठे मारले. तर काही मतदारांनी फुलीचा आडवा ठसा मतपत्रिकेवर लावला. मतदारांच्या या चुकीचा फटका उमेदवारांना बसला. त्यामुळे काही गटात अतिशय कमी फरकाने जय व पराभवाची गणिते समोर आली.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची होती. सगळ्या जागा निवडून आणल्या नाही तर मिशी ठेवणार नाही, असा दावा निवडणूक प्रचारा दरम्यान बांगर यांनी केला होता. (Hingoli) परंतु इथे बांगर यांच्या पॅनलला जोरदार दणका बसला. महाविकास आघाडीला १२ तर बांगर यांच्या भाजप-सेना युतीच्या पॅनलला फक्त पाच जागा जिंकता आल्या.

त्यानंतर बागंर यांच्यावर ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठवत मिशी कधी काढणार? असे आव्हान देखील दिले गेले. (Shivsena) हा वाद राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. परंतु ही नामुष्की बांगरावर का ओढावली? हे आता समोर आले आहे. कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ८११ मतदारांपैकी ७८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मात्र, हा हक्क बजावताना विविध गटात मतदारांनी मतदान करताना आपल्याला किती मतदान करावयाचे आहे याची पूर्ण माहिती न घेता अधिकची मते टाकली. त्यामुळे मतपत्रिका बाद झाल्या, तर काही मतदारांनी मतपत्रिकेवर फुलीचा ठसा न मारता स्वतःचा अंगठा लावला. त्यामुळे या मतपत्रिका अवैध ठरविण्यात आल्या. काही मतपत्रिकेवर फुलीचा आडवा ठसा मारल्यामुळे ती मते बाद झाली. प्रत्येक गटात बाद झालेल्या मतांची संख्या मोठी ठरली.

सहकारी संस्था मतदार संघ सर्वसाधारण गटांमध्ये झालेले वैध मतदान ३४३ तर बाद मते २९, याच गटातील सहकारी संस्था महिला राखीवमध्ये ३५६ वैध मतदान तर १६ मते बाद झाली. सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटामध्ये वैध मतदान ३५४ तर १७ मते बाद ठरली. याच मतदारसंघातील वीज भज गटामध्ये ३५१ वैध मतदान झाले तर २१ मते बाद ठरली.

ग्रामपंचायत मतदार संघामधील सर्वसाधारण गटात झालेले वैध मतदान ३०७ तर ५८ मत बाद झाली. अनुसूचित जाती जमाती गटामध्ये ३१५ वैध मतदान झाले तर ४९ मत बाद झाली. याच गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटामध्ये ३१२ मतदारांनी वैध मतदान केले तर ५१ मत बाद ठरली.

बाद मतांची संख्या व या गटात आलेले निकाल पाहता कमी फरकाच्या अंतराने उमेदवारांचे जय पराजयाचे आराखडे बदलून गेले. विशेष म्हणजे बाजार समितीचे मतदान हे मोजके असते, शिवाय मतदारांना ते कसे करावे याचे बऱ्यापैकी ज्ञानही असते. असे असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मते बाद झाली म्हणजे मतदारांनी हा जाणूनबुजून केलेला `कार्यक्रम` तर नाही ना? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT