Sanjay Shirsat, kalyan Kale  Sarkarnama
मराठवाडा

Sanjay Shirsat-Kalyan Kale Clash : पुढच्यावेळी तुम्हाला बैठकीला बसू देणार नाही, पालकमंत्र्यांच्या विधानावर खासदार काळे संतापले, म्हणाले तुम्ही कोण?

Kharif review meeting News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बोलू न देता उलट पुढच्या बैठकीला तुम्हाला बसू देणार नाही, अशी उद्दामपणाची भाषा संजय शिरसाट यांनी वापरल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला.

Jagdish Pansare

Shivsena-Congress News : काँग्रेसचे खासदार डाॅ. कल्याण काळे आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात खरीप हंगाम आढावा बैठकीतच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बोलू न देता उलट पुढच्या बैठकीला तुम्हाला बसू देणार नाही, अशी उद्दामपणाची भाषा संजय शिरसाट यांनी वापरल्याचा आरोप खासदार काळे यांनी केला.

मला बैठकीला बसू न देणारे तुम्ही कोण? मला वीस लाख लोकांनी निवडून दिले आहे, मी त्यांचे प्रतिनिधित्व करतो. मी कधीही, कुठल्याही बैठकीला बसू शकतो, मला रोखणारे तुम्ही कोण? असा संताप कल्याण काळे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती व खरीप हंगाम आढावा अशा एकत्रित बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच जालन्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण काळेही उपस्थित होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यातील आमदारांनी प्रदीर्घ चर्चा करत प्रश्न मांडले. खासदार कल्याण काळे हे देखील मका खरेदी, खत, बी-बियाणे या संदर्भात काय उपाय योजना केल्या पाहिजेत? यावर सविस्तर बोलत होते. त्याचवेळी पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी त्यांना रोखले.

हे सगळे विषय मी घेतले आहेत, एकाच विषयावर कितीवेळ बोलणार, आमदार जर दोन दोन तास बोलणार असतील तर कसे चालेल? अशाने पुढच्या बैठीकत तुम्हाला बसू द्यायचे की नाही? हे मला ठरवावे लागेल, अशी भाषा शिरसाट यांनी वापरली. यावर कल्याण काळे चांगलेच आक्रमक झाले. मी फक्त शेतकऱ्यांचे दोन मुद्दे मांडले आहेत. पुढच्यावेळी बसू देणार नाही, अशी भाषा वापरणारे तुम्ही कोण? यावर पुन्हा शिरसाट-काळे यांच्यात वादावादी सुरू झाली.

इतरांनी मध्यस्थी केल्यानंतर बैठकीचे कामकाज पुढे सुरू झाले. दरम्यान, कल्याण काळे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि खरीप आढावा बैठक एकाच दिवशी एकत्रित घेण्यावर आक्षेप नोंदवला. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून त्यांनी एकत्रित बैठक घेतली. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न मांडण्यासाठी प्रत्येक आमदाराने वेळ घेतला.

मी मका खरेदीबाबत महत्वाचा विषय मांडत होतो. हमीभाव 2400 रुपये असताना खासगी व्यापारी शेतकर्‍यांकडून बाराशे रुपयाने मका खरेदी करत आहे. यातून शेतकरी भरडला जात आहे, तेव्हा केंद्रा आणि राज्य सरकारने शेतकर्‍यांची मका हमी भावाने खरेदी करावी, ही माझी मागणी होती. पण पालकमंत्र्यांना बैठक आटोपण्याची एवढी घाई झाली होती की त्यांनी मला बोलूच दिले नाही. त्यांनी खरीप आढावा बैठक अगदी आटोपून घेतली, असा आरोप कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी केला.

तुम्हाला बैठकीला बसू देणार नाही, ही तर पालकमंत्र्यांची भाषा अतिशय चुकीची आणि उद्दामपणाची होती. मला बैठकीत बसण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? मला वीस लाख लोकांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. मी कोणत्याही बैठकीला बसू शकतो, आज खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला, अशी टीकाही काळे यांनी केली.

SCROLL FOR NEXT