Kirit Somaiya-Arjun Khotkar
Kirit Somaiya-Arjun Khotkar Sarkarnama
मराठवाडा

खोतकरांनी जालना सहकारी साखर कारखाना व एक हजार कोटींची जमीन बळकावली

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना बेनामी पद्धतीने फसवणूक करून खरेदी केला. यात त्यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला, एवढेच नाही तर राज्य सरकारच्या मालकीची, शेतकऱ्यांनी कारखान्यासाठी दिलेली तब्बल एक हजार कोटी किमंत असलेली शंभर एकर जमीन हडपण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी हे आरोप केले असून या संपुर्ण प्रकरणाचे कागदोपत्री पुरावे आपण ईडी, आयकर विभाग, राज्याचे तसेच केंद्राच्या सहकार विभागाकडे दिले आहेत. या शंभर कोटींच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या हे आज औरंगाबादेत आले होते, सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील ठाकरे सरकारमधील २३ मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून हे सगळे जेलमध्ये जाणार असल्याचे सांगत सोमय्या यांनी शरद पवार हे ईडी, इन्कम टॅक्स, उच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट, भाजप आणि किरीट सोमय्याला धमकी देत असल्याचा आरोप केला. परंतु त्यांनी आता धमक्यांची सिरीजच सुरू करावी, कारण मी आता आणखी एक नाव घेत आहे, आणि ते अर्जून खोतकर यांचे असल्याचे म्हणत सोमय्या यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, अनिल देशमुख यांच्या जेलमधील प्रत्येक मिनिटाची, तासाची किमंत केंद्र सरकारला मोजावी लागेल अशी धमकी शरद पवार देत आहेत. पण अनिल देशमुख यांना जेलमध्ये पवार आणि ठाकरे यांनी घातले. पवारांना अनिल देशमुखांची नाही, तर अजित पवारांची चिंता आहे. जरंडेश्वर प्रमाणेच अर्जून खोतकर यांनी देखील बेनामी पद्धतीने फसवणूक करून जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखाना हडप केला आहे.

या कारखान्याच्या खरेदीत त्यांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेली राज्य सरकारची जमीन बळकावण्याचे खोतकर यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. या जमीनीची किंमत जवळपास एक हजार कोटी आहे. खोतकर यांनी २०१२ पासून जालना सहकारी साखर कारखाना खरेदी करण्यासाठी तापडीया आणि मुळे यांच्या कंपन्याचा आधार घेतला.

कारखाना खरेदीच्या प्रक्रियेत या दोघांच्या कंपन्यांनी सहभाग घेतला, कारखाना खरेदी करण्यासाठी खोतकर यांनीच तापडीयाच्या कंपनीला पैसे पुरवले. त्यानंतर ४३ कोटींमध्ये खरेदी केलेला कारखांना तापडीया यांच्या कंपनीने पुन्हा खोतकर यांच्या अर्जून शुगर इंडस्ट्रीजला २७ कोटीत विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

औरंगाबादेत ईडीने तापडीया आणि मुळे यांच्या कार्यालयावर छापा टाकून जी कारवाई केली, ती या प्रकरणासाठीच होती, असेही सोमय्या यांनी सांगितले. खोतकर यांच्या घोटाळ्या संबंधी काही शेतकरी आणि व्यक्तींना आपण भेटण्यासाठी इथे आलो होतो. या संबंधीची सर्व कागत्रपत्रे आपण तपास यंत्रणाकडे दिली असून याची चौकशी सुरू असल्याचे देखील सोमय्या यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT