लातूरच्या भाजपमध्ये दोन महत्त्वाच्या नेत्यांचे सूर जुळू लागल्याने नवीन राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अभिमन्यू पवारांच्या कामाचे सार्वजनिकपणे कौतुक करत एकीचा संदेश दिला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या जवळिकीने स्थानिक राजकारणात नवा कलाटणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जलील पठाण
BJP Politics in Latur News : औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार आणि निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातले राजकीय वैर अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहे. हे वैर इतके खोलवर रुतले आहे की एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले आणि व्यासपीठावर एकमेकांशी बोलतांना दिसले तरी लोकांच्या मनात हे दोघे खरंच एक झालेत का? अशी शंका घेतली जाते. मात्र लातूर भाजप जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी बसवराज पाटील यांनी स्वीकारल्या पासून दोघांचे सूर जुळत असल्याचा अनुभव येत आहे.
औशात नगर परिषदेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ सभेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांनी अभिमन्यू पवारांना मिनी मुख्यमंत्री असे संबोधले. तो धागा पकडत आमदार संभाजी पाटलांनी अभिमन्यू पवार मिनी मुख्यमंत्री असतील तर त्यात माझाही फायदाच असल्याचे सांगत सगळ्यांना बुचकळ्यात टाकले. तर जिल्हाध्यक्ष बसवराज पाटलांनी संभाजी पाटलांचा उल्लेख माजी पालकमंत्री ऐवजी पालकमंत्री असा केला. त्यावर कदाचित उद्या ते पुन्हा पालकमंत्री होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
एकूणच एकाच पक्षात असलेले लातूर जिल्ह्यातील भाजपचे हे दोन आमदार आणि नेते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत असल्याचे चित्र आहे. अभिमन्यू पवारांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून संभाजी पाटील निलंगेकरांकडे पाहिले जाते. अधून मधून एखाद्या कार्यक्रमात ते एकत्र दिसतात त्यावेळीही ते एकमेकांवर कोटी करण्याचा प्रयत्न करतात. मागील पंधरा दिवसांपूर्वी किल्लारी येथील निलकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 42 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात अभिमन्यू पवारांनी आपल्या भाषणात संभाजी पाटलांची आणि माझी स्पर्धा विकासाची असल्याचे सांगितले.
लातूर गुलबर्गा रेल्वे औशातूनच द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. त्यावर संभाजी पाटलांनी दोन रेल्वे द्या, एक औशातून आणि एक निलंग्यातून असा चिमटा काढला होता. हे उदाहरण ताजे असतानाच औशात संभाजी पाटील यांनी अभिमन्यू पवारांबद्दल मवाळ भाषा वापरली. अभिमन्यू आणि मी कितीही एका मनाने एकत्र आलो तरी लोकांना आमच्यात असलेल्या प्रेमाबद्दल शंकाच येते. आम्ही दोघे एकत्र येतांना आपापसात काय बोलायचे हे ठरवूनच येत असतो.
अभिमन्यू पवार कडक स्वभावाचे असल्याने माझ्यापेक्षा जास्त वेगाने ते काम करतात. एखादे काम त्यांनी कसे केले हे मलाही जाणून घ्यायचे असते, तेव्हा मी त्यांना आवर्जून बोलतो. रेल्वे जर औशातून जात असेल तर औसा एमआयडीसीमध्ये माझाही मोठा प्लॉट असल्याने याचा फायदा अप्रत्यक्षरित्या मलाही होणार आहे. अभिमन्यू जर मिनी मुख्यमंत्री असतील तर यामध्येही माझाच फायदाच आहे असे सांगून त्यांनी एकप्रकारे अभिमन्यू पवारांची प्रशंसाच केल्याचे बोलले जाते.
हे दोघे खरेच एकत्र आले आहेत की त्यांचे हे वागणे नाटकी? असा प्रश्न उपस्थितांना पडला. मात्र हे खरे आहे की बसवराज पाटलांनी जिल्हाध्यक्ष पदाची कमान संभाळल्यापासून पवार- पाटलांचे सूर जुळत आहेत. हे सूर आधीच जुळले असते तर कदाचित लातूर जिल्ह्याला देवाभाऊंच्या सरकारमध्ये मंत्रीपद तरी मिळाले असते? अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अभिमन्यू पवारांचे कौतुक केले, ज्यामुळे राजकीय चर्चेला ऊत आला.
दोन्ही नेत्यांतील दूरावा कमी होऊन भाजपमध्ये एकी वाढत असल्याचे संकेत मानले जात आहेत.
होय, दोघांची एकत्र येण्याची शक्यता स्थानिक निवडणुकीत मोठा फरक करू शकते.
स्थानिक पातळीवरील राजकीय स्पर्धेमुळे दोघांमध्ये सौम्य मतभेद असल्याचे म्हटले जात होते.
बहुतेकांनी हे सकारात्मक पाऊल मानले असून पक्षातील वातावरण सकारात्मक झाल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.