Ashok Chavan-Jitesh Antapurkar
Ashok Chavan-Jitesh Antapurkar Sarkarnama
मराठवाडा

देगलूर-बिलोलीत भाजपचा निघाला घाम, तर महाविकास आघाडी सरकार भक्कम

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः राज्यात विरोधकांकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतांना देगलूर-बिलोलीच्या जनतेने महाविकास आघाडी सरकारवर विश्वास दाखवला आहे. जितेश अंतापूरकर यांना विजयी करत जनतेने खऱ्या अर्थाने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांना या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली आहे. पोटनिवडणुकीतील या विजयाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अधिक भक्कम झाले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

देगलूर-बिलोली पोटनिवडणुकीत काॅंग्रेस महाविकास आघाडीचे जितेश जिंतापूरकर हे जवळपास विजयी झाले आहेत. २८ व्या फेरीअखेर अंतापूरकर यांना ४० हजार मतांची आघाडी आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित झाल्यानंतर या निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागलेले अशोक चव्हाण आनंदीत झाले आहे. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी या विजयाबद्दल देगलूर-बिलोलीच्या मतदारासह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे, जिल्ह्यातील जनतेचे आभार मानले.

चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रासह देशभरातील पोटनिवडणुकीत काॅंग्रेसला चांगले यश मिळाले आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि दादरा नगर हवेली मतदारसंघात भाजप विरोधी कल देण्यात आला आहे. महाराष्ट्रात जनतेने भाजपच्या सातत्याने सरकार अस्थिर करण्याच्या आणि ते पाडण्याच्या प्रयत्नांना सडेतोड उत्तर दिले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधानंतर जितेश यांच्यापाठीशी सहानुभूती निश्चितच होती, एक सुशिक्षित आणि कोरी पाटी असलेला उमेदवार असल्याने मतदारांनी त्याला विजयी केले.

विरोधकांचा अजेंडा हा द्वेषाचा होता, तर माझा विकासाचा. या पोटनिवडणुकीत भाजपने केंद्रीय मंत्र्यांना आणले, त्यांनी मतदारांना चिथवण्याचा प्रयत्न केला. पण मतदारांनी तो हाणून पाडला. हा विजय महाविकास आघाडीसाठी महत्वाचा तर होताच पण यामुळे हे सरकार अधिक भक्कम झाले आहे, याचा पुनरुच्चार देखील चव्हाण यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विजयाबद्दल आत्ताच आपले फोनवरून अभिनंदन केले आहे, मी देखील दादरा नगर हवेलीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. जितेशला उमेदवारी देतांना पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या सगळ्यांनी संमती दर्शवली. या सगळ्यांचे हे यश आहे.

वंचित बहुजन आघाडी किंवा एमआयएमला मतदान म्हणजे भाजपला मदत हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराचा प्रभाव जाणवला नाही. कदाचित गेल्यावेळी पेक्षा कमी मतदान या उमेदवाराला झाले असावे, असे सांगत अशोक चव्हाण यांनी देगलूर-बिलोलीच्या मतदारांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT