Girish Mahajan-Manoj Jarange Hunger Strike Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan - Manoj Jarange Hunger Strike : उपोषणाचा मार्ग स्वीकारू नका, महाजनांचे आवाहन; जरांगेंनी सगळंच काढलं...

अनुराधा धावडे

Manoj Jarange News : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. आजपासून (२५ ऑक्टोबर) जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. जरांगेंनी उपोषण सुरू करताच आज मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंशी फोनवरून संवाद साधला.

या संभाषणात महाजनांनी जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आता माघार घेणार नसल्याचे जरांगेंनी स्पष्ट करत महाजनांवर प्रश्नांचा भडिमार केला. 'तुम्ही १५ दिवस मागितले आम्ही ४० दिवस दिले, तुम्ही आरक्षण दिले नाही, मग तुम्ही आंदोलकांचे गुन्हे कधी मागे घेणार, असा खडा सवाल विचारत एकप्रकारे आपण आता मागे हटणार नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.

उपोषणाचा मार्ग स्वीकारू नका, अशी विनंती करत राज्य सरकार आरक्षणाचे काम करत आहे. आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. पण तुम्ही टोकाची भूमिका घेऊ नका, मुख्यमंत्र्यांनी समिती नेमली आहे. ते काम करत आहेत.

असे सांगितले. त्यावर, समिती दोन वर्षे काम करेल तोपर्यंत आमच्या पोरांनी काय फाश्या घ्यायच्या, असा संतप्त सवाल जरांगेंनी केला. दोन दिवसांत आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतो असे सरकार म्हणाले होते. पण तुम्हाला तेही होत नसेल तर तुम्ही आरक्षण कधी देणार, असाही प्रश्न जरांगेंनी विचारला.

जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी १६ जणांनी आत्महत्या केली. त्यांच्याबाबत सरकारला काहीच सहानुभूती नाही का, आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली का, याची माहिती तुम्ही घेतली का घेतली नसेल तर ती घ्या, जी व्यक्ती गेली, किमान त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळाली तर त्यांची कुटुंबे, लेकरं-बाळं उघड्यावर पडणार नाहीत.

मंत्री गिरीश महाजनांनी त्यांची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आम्हाला तुम्हाला १०० टक्के आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठी राज्य सरकारचे कामही वेगाने सुरू आहे, पण तुम्ही सध्या हा निर्णय थांबवा, टोकाची भूमिका घेऊ नका. दोन दिवसांत तुम्हाला रिझल्ट देतो. नियमानुसार सर्व कामे करायची आहेत, असे महाजनांनी जरांगेंना सांगितले.

त्यावर, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायचे, आत्महत्याग्रस्त तरुणांच्या कुटुंबांतील एका व्यक्तीला नोकरी द्यायची आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना मदत द्यायची, या दोन-तीन प्रश्नांवर तातडीने काम करा, अशी विंनती जरांगेंनी केली. तुमच्या भरोशावर आम्ही राहायचे ४० दिवस द्यायचे, पण तुम्ही तर डावच टाकून ठेवलाय, तुम्ही काहीच चांगले होऊ देत नाही, असा आरोपच जरांगेंनी केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT