manoj jarange patil News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : मुख्यमंत्र्यांच्या निवेदनापर्यंत 'वेट अ‍ॅण्ड वॉच', बीडच्या सभेत आंदोलनाची घोषणा करणार..

Jagdish Pansare

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नागपूरच्या अधिवेशनात उद्या दि. 18 रोजी सविस्तर निवेदन करणार आहेत. तोपर्यंत आपण 'वेट अ‍ॅण्ड वॉच' ची भूमिका घेऊ. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची घोषणा केली नाही, तर आपण आंदोलनावर ठाम आहोत. (Manoj Jarange Patil News) पण त्याची दिशा आज जाहीर करणार नाही, गनिमीकावा पद्धतीने निर्णय घेऊ. आतापर्यंत आपली सरकारने फसवणूक केली, पण इथून पुढे ती होऊ द्यायची नाही.

आंदोलनाची दिशा मी आज जाहीर करू शकतो, पण तुमच्या सगळ्यांच्या विचाराने २३ रोजी बीड येथे होणाऱ्या सभेत ती केली जाईल, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारविरोधातील आंदोलनासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले. (Maratha Reservation) अंतरवाली सराटीत आज झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी तासभर उपस्थितीत मराठा समाज बांधवांशी खुली चर्चा केली. (Jalna) मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर सगळ्या तयारीनिशी धडक देण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.

कुठल्याही परिस्थिती माघार घेणार नाही, आंदोलन असे नियोजनबद्ध करू की करोडो मराठा एकत्र आला पाहिजे, पण उद्रेक होता कामा नये. (Marathwada) मला मराठ्यांची पोरं अडकलेली चालणार नाही. नियोजनासाठी वेळ हवा असेल तर 24 नंतर सरकारला तसे न सोडता एक छोटे काही दिवसांचे उपोषण पुन्हा करू, असे मला वाटते असे म्हणतात उपस्थितांनी `पाटील आता उपोषण नको` अशी भूमिका घेत विरोध दर्शवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बीडच्या सभेत 24 नंतरच्या आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जरांगे पाटील यांनी काही दिवसांच्या उपोषणाचा प्रस्ताव ठेवत मराठा समाजाच्या भावनेला हात घातला. मनोज जरांगे पाटील यांनी दोनवेळा बेमुदत उपोषण करत सरकारला जेरीस आणले होते. थेट मुख्यमंत्र्यांना अंतरवालीत धाव घेऊन जरांगे यांचे उपोषण सोडवावे लागले होते. या आंदोलनामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती प्रंचड खालावली होती. त्यामुळे आता पुन्हा उपोषण नको, अशी भूमिका उपस्थिती हजारोंच्या समाज बांधवांनी घेतली.

मराठा आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर 24 डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची सगळी तयारी आम्ही वेळेत करू, पण आता पुन्हा उपोषण करायचे नाही, या निर्णयावर मराठा समाज बांधव ठाम होते. या सगळ्यांच्या भावनांचा विचार करत जरांगे यांनीही उपोषणाचा विचार सोडून पुढच्या आंदोलनाची पक्की तयारी करा, असे आवाहन करतांनाच मोठ्या लढाईचा इशारा दिला.

गेल्यावेळी सरकारने 30 दिवसांची वेळ मागितली होती, आपण चार दिवसावर ठाम होते, तेव्हा बुद्धीने वागलो आणि सरकारला चाळीस दिवस दिले. त्यामुळे सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटला, त्याचा परिणाम म्हणून आज 56 लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.

सरकारने लेखी दिलेल्या निवेदनानूसार या सगळ्यांना आता कुणबी प्रमाणपत्र आणि त्याआधारे ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे. हा आकडा सव्वा कोटीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारही जरांगे पाटील यांनी सर्वांच्या साक्षीने केला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT