Manoj Jarange Patil Warn CM Devendra Fadnavis News Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : आता वेडवाकडं वागलातं तर मोदी सरकारलाही हादरा! मनोज जरांगे पाटील यांचा इशारा..

Activist Manoj Jarange Patil issues a strong warning to the Chief Minister : पोलीस आहे म्हणून मागच्यावेळी केला तसा प्रयत्न केला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील. तुम्हाला माणसांबद्दल प्रेम, आपुलकी नाही. ती असती तर गेल्या वेळी नऊ वर्षाच्या मुलीला गोळी घातली नसती.

Jagdish Pansare

Maratha Reservation : आतापर्यंत झालं ते झालं, मागच्या वेळी तुम्ही गडबड केली, पुन्हा आता तशी खोडी काढायच्या भानगडीत पडू नका फडणवीस साहेब. पोलीसांच्या बळावर काही करायचा प्रयत्न कराल, तर राज्यातल्याच नाही, दिल्लीतल्या मोदी सरकारलाही हादरा बसेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) येत्या 29 रोजी पुन्हा मुंबईत धडक देणार आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव 27 रोजीच मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. तत्पूर्वी या मोर्चाची पुर्वतयारी म्हणून मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गाव बैठका घेत आहेत. लातूर-धाराशिव दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.

आमच्याकडे पोलीस आहे म्हणून तुम्ही मागच्यावेळी केला तसा प्रयत्न केला तर मराठे कोणत्याही टोकाला जातील. तुम्हाला माणसांबद्दल प्रेम, आपुलकी नाही. ती असती तर गेल्या आंदोलनाच्यावेळी नऊ वर्षाच्या मुलाला गोळी घातली नसती. (Devendra Fadnavis) आमच्या आया-बहिणी, लेकरांवर तुम्ही गोळ्या झाडल्या. त्या लेकराच्या पायातून आरपार गोळी गेली तेव्हा तिचा जीव काय म्हणला असलं? तेव्हा तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही पुन्हा अशी खोड काढू नका, तुम्हाला ती सवय आहे म्हणून सांगतो.

मराठे नेहमी नेहमी मार खाणार नाहीत, मराठ्यांना जे द्यायचं ते नीट आणि सरळ द्या. यावेळी मराठे इतक्या मोठ्या संख्येने मुंबईत येणार आहेत, की पाणंद रस्ता देखील मोकळा राहणार नाही. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही हे लक्षात ठेवा. पुन्हा काही घडवण्याचा प्रयत्न केला तर फडणवीस साहेब यावेळी फक्त राज्यातील सरकारलाच नाही तर दिल्लीत बसलेल्या मोदी सरकारलाही हादरा बसेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

आमच्या नोंदी अधिकृत, आता कोण रोखणार?

शिंदे समितीची मुदत संपत आली असताना नोंदीचा अहवाल तयार नव्हता. पण नंतर तो तयार झाला आणि आमच्या 58 लाख नोंदी अधिकृत झाल्या. आता विरोध करणाऱ्यांचा बाप आणि वरून आजा जरी खाली आला तर त्या रद्द होऊ शकत नाही. आता शिंदे समितीचा अहवाल सरकारला सादर होणे, तो त्यांनी स्वीकारणे आणि कायदा करणे एवढेच शिल्लक राहिले आहे. या माध्यमातून आम्ही तीन कोटी मराठे ओबीसी आरक्षणात घातले आहे, उर्वरित 29 आॅगस्टच्या मोर्चानंतर जातील. मराठ्यांना आता कोणीही फसवू शकत नाही, रोखू शकत नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT