Marathwada Teacher Constituency News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada Teacher Constituency : गुरुजींनी दाखवला उत्साह, मतदानाची टक्केवारी ८६ च्या पुढे..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आज झालेल्या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. आठही जिल्ह्यांमध्ये सरासरी ८६ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ९२ टक्के मतदान हे (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी ८० टक्के मतदानाची नोंद औरंगाबाद जिल्ह्यात झाली आहे.

हिंगोली, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला या ठिकाणी ९० टक्क्यांच्यावर मतदान झाले. (Marathwada) राज्यातील सत्तांतरानंतर ग्रामपंचायतीनंतर ही विधान परिषदेची पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा हा थेट सामना असून यात कोणाची सरशी होते हे २ फेब्रुवारीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

शिक्षक आणि पदवीधर अशा पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी आज प्रत्यक्ष मतदान झाले. दरम्यान, नाशिक, नागपूरच्या उमेदवारीवरून बरेच राजकीय नाट्य रंगले होते. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. परंतु त्यांना पक्षातूनच बंडखोरी सहन करावी लागली. प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता.

तर भाजपच्या किरण पाटील यांना देखील नितीन कुलकर्णी यांच्या बंडखोरीला तोंड द्यावे लागले. वंचित बहुजन आघाडी, प्रहार आणि काही अपक्षांनी जोर लावला असला तरी महाविकास आघाडीचे काळे हे चौथ्यांदा विक्रमी विजयाला गवसणी घालण्याचीच अधिक शक्यता आहे. मतदारांमधील उत्साह पाहता महाविकास आघाडीने प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत काळेंना पहिल्या पसंतीच्या मतांवरच विजयी करण्याची रणनिती आखल्याचे स्पष्ट होते.

भाजपच्या किरण पाटील यांनी शेवटच्या टप्यात प्रचारात आघाडी घेतली असली तरी त्यांच्याकडे नवखे म्हणूनच पाहिले गेले. गेल्या १८ वर्षापासून या मतदारसंघावर राष्ट्रवादीची मजबूत पकड आहे. ती यावेळीही कायम राहणार असेच चित्र आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे वेतन आणि शाळांच्या अनुदानाच्या मुद्यावरून भाजपने शिक्षकांना आश्वासने दिली असली तरी त्यावर मतदार किती विश्वास ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मतदारांमधील उत्साह पाहता विक्रम काळे चौथ्यांदा निवडून येतील, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनूसार सर्वाधिक ९२ टक्के मतदान हे उस्मानाबाद जिल्ह्यात झाले आहे. तर औरंगाबादमध्ये ८० टक्के मतदानाची नोंद आहे. हिंगोली-९१, परभणी-९०, लातूर-८६, नांदेड-८४, तर जालन्यात ८२ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT