Chandrakant Khaire Reaction News, Aurangabad
Chandrakant Khaire Reaction News, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Marathwada : शिवसेनेत चाललंय काय? खैरेंकडून `ते` विधान मागे, दिलगिरीही व्यक्त..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिंदे गटातील १६आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडू नये आणि आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काॅंग्रेसच्या २२ आमदारांची सोय करून ठेवली आहे, असा खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काल औरंगाबादेत केला होता. आज चोवीस तासाच्या आतच त्यांच्यावर घुमजाव करण्याची वेळ आली आहे.

काॅंग्रेसकडून याबद्दल तिखट प्रतिक्रिया उमटल्यानंतर खैरे (Chandrakant Khaire) यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खैरेंच्या विधानबद्दल नाराजी व्यक्त करतांनाच ज्यांना सत्ता असतांना आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्या (Shivsena) शिवसेनेने काॅंग्रेसबद्दल बोलू नये, असा टोला देखील पटोले यांनी लगावला होता.

यावर आता वरिष्ठ पातळीवर देखील प्रतिक्रिया उमटल्याचे दिसते. उद्धव ठाकरे यांनी खडसावल्यानंतर खैरे यांनी तातडीने प्रसार माध्यमांकडे खुलासा करत आपण बोललो ते वक्तव्य आजचे नाही, तर ती जुनीच बातमी आहे. भाजपकडे सातत्याने फोडोफोडीचे राजकारण सुरू आहे आणि त्यापासून काॅंग्रेसने सावध राहावे, असे मला सुचवायचे होते. पण माझ्या या विधानामुळे आमचे मित्र काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाराज झाल्याचे मला समजले.

महाविकास आघाडीवर त्याचा कुठलाही परिणाम होवू नये, नाराजी वाढू नये म्हणून मी माझे शब्द मागे घेतो. या विधानामुळे त्यांना वाईट वाटले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात खैरे यांनी आपले विधान मागे घेतले आहे. राज्यात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतरही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस हे दोन पक्ष शिवसेनेच्या पाठीशी मजबुतीने उभे असल्याचे पहायला मिळाले.

अंधेरी पुर्व पोटनिवडणुकीत या दोन्ही पक्षांनी शिवसेनेच्या उमेदवार लटके यांना पाठिंबा देखील जाहीर केला. शिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकत्रित लढण्याची तयारी देखील दाखवली. एवढेच नाही, तर राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सहभागी होणार आहेत.

राज्य आणि देश पातळीवर महाविकास आघाडी भक्कम असतांना आघाडीतील शिवसेनेच्या एका नेत्याने काॅंग्रेसचे २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली होती.भाजपने देखील याचा राजकीय फायदा उचलत त्याला दुजोरा देण्याचा प्रयत्न केला. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण सुरू असतांनाच काॅंग्रेसने देखील शिवसेनेला आरसा दाखवत सत्ता असतांना तुम्हाल तुमचा पक्ष सांभाळता आला नाही, असा टोला लगावत नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर तातडीने सुत्रे हलली आणि उद्धव ठाकरे यांनी खडसावल्यानंतर खैरेंनी आपले विधान मागे घेत दिलगिरी व्यक्त केल्याचे दिसून आले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये आदित्य ठाकरे यांची सभा होणार म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता ती रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT