Sandipan Bhumre, Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News
Sandipan Bhumre, Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मराठवाडा

भुमरे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदेंमुळेच उद्धव ठाकरेंचं दुखणं गेलं,त्यांनीच आभार मानावे...

सरकारनामा ब्यूरो

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केलं आणि भाजप व सोबत आलेल्या आमदारांच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून देखील या दोन गटात चुरस निर्माण झाली असून मुंबईत होत असलेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यास गर्दी जमवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच तयारीच्या औरंगाबाद येथील सभेत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर उद्धव ठाकरे यांचं दुखणं गेलं आणि आता त्यांचं स्टेज बाहेर आलं आहे. यामुळे त्यांनी शिंदेंचे आभार मानले पाहिजे,असा खोचक टोला लगावला आहे. (Sandipan Bhumre, Eknath Shinde, Uddhav Thackeray Latest News)

संदीपान भुमरे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतांना फक्त टीव्ही चालू झाल्यानंतरच दिसायचे. अडीच वर्षे मी कॅबिनेट मंत्री होतो, पण सगळ्या बैठकींना मुख्यमंत्री ठाकरे नसायचे. ते फक्त टीव्हीवर दिसायचे. मात्र, टीव्ही बंद झाला की ते दिसत नव्हते. साहेब आमचे पत्र घ्यायचे आणि ठेऊन द्यायचे, आम्ही पीएला विचारले की, सहीच केली नाही, असे ते सांगायचे. असा उद्धव साहेबांचं कारभार होता, अशा शब्दात भुमरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री असतांना ठाकरे सांगायचे की, भुमरेंना निधी द्या, मात्र अजितदादा म्हणायचे निधीच नाही. दादा कसे काय निधी देतील? दादाला माहीत आहे. निधी जर दिला तर पैठण मतदारसंघात जिंकणं अवघड होईल. लोक म्हणायचे, आमचे कामे करा, पण आमचेच होत नाहीत तुमचे कधी होतील,असा सवाल आमच्या मनात पडायचा. आम्ही मिटिंगला जायचो तेव्हा मी जावून आलो, असे ठाकरे म्हणायचे आणि तुमचं-तुमचं चालू द्या, असे ते सांगत. अरे आमच्या आमच्यात चालू द्यायचे होते तर इथे कशाला आलो असतो, असा टोला देखील त्यांनी ठाकरेंना लगावला.

आम्ही निर्णय घेतला नसता तर आम्हाला यांनी संपवलं असतं. टीव्हीत बोलतानाही मास्क, आम्ही ज्यावेळी त्यांना भेटायला जात होतो, तेव्हा दुरूनच मास्क मास्क म्हणायचे. आता मात्र एकनाथ शिंदेंमुळे तुमचा स्टेज बाहेर आला असून तुम्ही,आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे बाहेर आले, तुमचं दुखणंही गेलं, गळ्याचा पट्टा गेला, मास्क गेला, आता मातोश्रीवर सगळ्यांना इन्ट्री आहे, अशा शब्दात भुमरेंनी ठाकरेंच्या आजाराची खिल्ली उडवली आहे. आता भुमरेंच्या या टीकेवर सेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT