Mla Kailas Patil Warn News, Osmanabad.
Mla Kailas Patil Warn News, Osmanabad.  Sarkarnama
मराठवाडा

Mla Kailas Patil News : सात दिवसात पंचनाम्याच्या प्रती द्या, नाहीतर विमा कंपनी कार्यालयाला टाळे ठोकतो..

सरकारनामा ब्युरो

Osmanabad : केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या भारतीय कृषी विमा कंपनीची मुजोरी वाढत असल्याचे गेल्या काही दिवसापासुन निर्दशनास येत आहे. प्रशासनाकडुन कंपनीकडे वारंवार मागणी करुनही पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन दिल्या जात नाहीत, त्यामुळे आता (Shivsena) शिवसेना स्टाईलने कंपनीला उत्तर द्यावे लागेल. येत्या सात दिवसांत पंचनाम्याच्या प्रती दिल्या नाहीत, तर विमा कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिला.

खरीप २०२२ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातील पिक संरक्षित करण्याकरीता शेतकऱ्यांनी विमा काढला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले. (Kailas Patil) त्यानुसार विमा जमा झाला मात्र तो असमान व अत्यल्प दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर तोकडी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आल्याने हा शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.

सहा लाख ६८ हजार ४३६ शेतकऱ्यांनी विमा काढून पिके संरक्षित केली होती. यासाठी शेतकरी,राज्य व केंद्र शासन मिळून विमा कंपनीला ५०६ कोटी रुपये दिले आहेत. जिल्ह्यामध्ये शंखी गोगलगाय, येलो मोझॅकच्या प्रादुर्भावाने पिके धोक्यात आली. नंतर सततचा पावसाने पिकांची अपेक्षित वाढ झाली नाही. नंतर अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे सोयाबीन, तूर मुग, उडीद जवळपास नष्ट झाले.

खरीप हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. दरम्यान मतदारसंघात पाहणी दौरे करून संबंधित कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याबाबत घाडगे पाटील यांनी सूचना दिल्या. मागील अनुभव लक्षात घेऊन ७२ तासाच्या आत नुकसानीची पूर्वसूचना देण्याबाबत आवाहन केले. म्हणून जिल्ह्यातून बाधित क्षेत्र असलेल्या चार लाख ८६ हजार ९५६ एवढ्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्वसूचना केल्या होत्या.

कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडुन नुकसानीची टक्केवारी दाखविली असली तरी बाधित क्षेत्रामध्ये बदल केल्याचा संशय शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रती मिळाल्याशिवाय सत्य समोर येणार नाही. पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देऊन त्याचे सामाजिक सर्व्हेक्षण करणे गरजेचे आहे, पण प्रशासनाने वारंवार मागणी करुनही कंपनी पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देण्यास टाळाटाळ करत आहे.

या अगोदर जिल्ह्याला खाजगी विमा कंपनीने लुटले असुन आता ही केंद्राची कंपनी असतानाही तशीच लुट करण्याचा प्रयत्न करीत आहे. निर्ढावलेल्या केंद्र सरकारच्या भारतीय कृषी विमा कंपनीने आतापर्यंत केवळ पाच हजारच पंचनामे उपलब्ध करून दिले. या कंपनीवर केंद्र व राज्य सरकारचा वचक नसल्याचे स्पष्ट होत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT