Imtiyaz Jaleel Asaduddin Owaisi  Sarkarnama
मराठवाडा

Loksabha Election 2024 : "हल्के में ना लो हमें! है तैयार हम!," MIM च्या जलील यांनी फडकावलं निशाण

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीचा ( Loksabha Election ) बिगूल मार्च महिन्यात वाजण्याची शक्यता आहे. देशातील सगळ्या भाजप ( Bjp ) विरोधी राजकीय पक्षांनी यासाठी तयारी करताना केंद्रातील भाजप सरकार खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. पण, घोडा मैदान समोर असतानाच विरोधकांमध्ये फूट पडली. 'इंडिया' आघाडीचे प्रवर्तक असलेले नितीश कुमारच ( Nitish Kumar ) भाजपला जाऊन मिळाले. तर, भाजपचा पराभव करायचा असेल तर आम्हाला 'इंडिया' आघाडीत का घेत नाही? असा सवाल करत 'एमआयएम'ने नाराजी व्यक्त केली होती. आता खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी 'एक्स' अकाउंटवर एका फोटो ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत 'एमआयएम'ने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती करत धुमाकूळ घातला होता. राज्याच्या राजकारणात 'एमआयएम' आणि वंचितच्या आघाडीनं लोकसभा निवडणुकीत तब्बल 37 लाख मते घेत प्रस्थापित पक्षांच्या अनेक खासदारांचा दिल्लीचा मार्ग रोखला होता. एवढेच नाही तर राज्यातून या आघाडीचा पहिला खासदार इम्तियाज जलील यांच्या रुपाने छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून दिल्लीत गेला होता. पण, वंचित-'एमआयएम'च्या या आघाडीला अल्पावधीतच ग्रहण लागले आणि प्रकाश आंबेडकरांनी विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली.

( राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

'एमआयएम' आणि वंचित या दोन्ही पक्षांना याचा फटका बसला. लोकसभेला दोघांनी मिळून 37 लाख मते घेतली होती, ती विधानसभा निवडणुकीत घटली आणि वंचितला स्वबळावर 24 लाख मते मिळाली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी तब्बल वीस मतदारसंघात प्रभावी ठरू शकते, असा दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीने आंबेडकरांसाठी पायघड्या टाकल्या.

आता वंचित महाविकास आघाडीचा भाग झाल्यात जमा आहे. दुसरीकडे, 'एमआयएम' मात्र अजूनही नव्या मित्राच्या शोधात आहे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडे जशी दलित, ओबीसी, भटक्या जमातींची वोट बँक आहे. तशीच मुस्लिमांची एकगठ्ठा मतं देणारी वोट बँक 'एमआयएम' बाळगून आहे. मात्र, स्वबळावर 'एमआयएम'चा विरोध कमी पडतो. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना 'एमआयएम'च्या उमेदवारांनी गेल्या निवडणुकीत घेतलेल्या मतांची चर्चा होते.

विधानसभेत कोणत्या मतदारसंघात 'एमआयएम'चा उमेदवार कितव्या क्रमांकावर होता, याचाही हिशोब लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सगळे विरोधी पक्ष एकवटले असताना 'एमआयएम'ला त्यापासून दूर ठेवण्यात आले आहे. याची सल खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे अनेकदा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओवैसी बंधू आणि राज्यातील 'एमआयएम'च्या नेत्यांमध्ये फारशा हालचालीही दिसून येत नाहीत.

अशातच इम्तियाज जलील यांनी विरोधकांना सूचक इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. जलील यांनी 'एक्स' अकाउंटवर 'एमआयएम'चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्याबरोबर एक फोटो ट्वीट केला. त्यावर 'हल्के में ना लो हमें! है तैयार हम!' असं लिहित जलील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. आता 'एमआयएम'नं लोकसभेसाठी किती तयारी केलीय, हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्याच दिसून येईल.

Edited By : Akshay Sabale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT