Sarkarnama
मराठवाडा

NCP News: सुनेत्रा पवारांच्या बीड दौर्‍यात राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, आमदार पंडितांचेही मौन!

NCP Beed News: पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. बीड नगरपालिकेतील अंतर्गत वाद, विकासकामांवरील नाराजी आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्या मौनाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Jagdish Pansare

Beed Municipal Council : पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन दिवसांचा बीड दौरा नुकताच पार पडला. याआधी पवार या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजवंदनासाठी बीडमध्ये आल्या होत्या. त्यानंतर दोन-अडीच महिन्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी निमित्ताने त्यांचा जिल्हा दौरा झाला. उशीरा दौरा करण्यामागची कारणेही त्यांनी बीडकरांना सांगितली.

परंतु ज्या नगरपालिकेची सत्ता जनतेने अजित पवारांच्या आश्वासक विकासाच्या चेहऱ्याकडे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती दिली, ती सत्ता अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीमुळे हातून जाते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या माघारी जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये कुरबुरी सूरूच असतात, पण थेट त्यांच्यासमोरच गटबाजीचे प्रदर्शन झाल्याने पक्षाची घडी विस्कटल्याचे दिसून आले आहे. नेत्यांचे स्वागत करण्याची स्पर्धाच या दोन गटांमध्ये लागली होती.

सुनेत्रा पवार यांचे स्वागत नगराध्यक्ष प्रेमलता पारवे आणि उपाध्यक्ष विनोद मुळूक, अमर नाईकवाडे फायक पटेल यांनी स्वतंत्रपणे केले. ही गोष्ट पालकमंत्र्यांच्या नजरेतून सुटली नाही. शिवाय दोन गटातील गटबाजीच्या तक्रारीही त्यांच्यापर्यंत पोहचल्या होत्या. त्यामुळे त्यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा करत त्यांना समज दिल्याचे बोलले जाते.

दिवंगत नेते अजित पवार यांनी बीड शहर आणि जिल्ह्याचा विकास बारामती, पिंपरी चिंचवड प्रमाणे करण्याचे पाहिलेले स्वप्न आपल्याला सत्यात उतरवायचे आहे. अशावेळी सगळ्यांनी एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवा, विकास कामांवर, जनतेचे प्रश्न सोडवण्यावर याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्या, असे सुनेत्रा पवार यांनी दोन्ही नाराज गटांना सांगितल्याची चर्चा आहे. आता याचा किती परिणाम या पदाधिकाऱ्यांवर होतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

विजयसिंह पंडितांचे मौन?

गेवराईचे आमदार विजयसिंह पंडीत यांच्यावर नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी मोठी जबाबदारी सोपवली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडत नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ताही आणली. परंतु ही सत्ता नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरपालिकेतील पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना झेपावेना, अशी परिस्थिती आहे.

गेल्या सहा महिन्यात दिवंगत अजित पवार यांना अपेक्षित असे कोणतेच काम बीड शहरात झाल्याचे दिसत नाही. उलट नागरिकांची ओरड सुरू झाली आहे. रस्ते, पाणी, कचरा, वीज या समस्या जैसे थे आहेत. भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासारखे विरोधकही सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले आहेत.

बीडच्या जनतेने अजितदादा पवारांच्या चेहऱ्याकडे आणि त्यांच्या विकासाच्या व्हिजनला पाहून तुम्हाला सत्ता दिली. त्यामुळे कामे करा, भ्रमात राहू नका, असा सल्ला संदीप क्षीरसागर यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना अप्रत्यक्ष रित्या दिला होता. चोहोबाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला होत असताना पंडितांचे मौन सगळ्यांनाच खटकत आहे. या सगळ्या परिस्थितीवर पालकमंत्री सुनेत्रा पवार काय मार्ग काढतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT