Sharad Pawar News Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar News : 'शिवसेनेच्या चिन्हाबाबत केंद्रातील शक्तिशाली घटकांनी हस्तक्षेप केला'; पवारांचा इशारा कुणाकडे ?

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar Press Conference : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड करत थेट पक्षाच्या अध्यक्ष पदावरच दावा केला आहे. तसा दावा त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये केला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना भूमिका मांडण्यासाठी नोटीस दिली आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचा दाखला देत आयोगाच्या निर्णयावर संशय व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) बोलत होते. यावेळी पवार म्हणाले, ''निवडणूक आयोगाने आम्हाला विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर दिले. आज हा प्रश्न काळजी करण्यासारखा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांचा स्वतःचा असेल तर त्याची मला चिंता नाही. परंतु मला असे दिसतेय शिवसेनेचा (ठाकरे गट) जो निर्णय झाला त्याच्यामध्ये असे लक्षात आले की केंद्र शासनातील काही शक्तिशाली घटकांनी त्याठिकाणी हस्तक्षेप केला,'' असा आरोप केला.

''त्याचा परिणाम आज त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर झाला. तोच प्रयोग आमच्यावर करण्याची पाउले टाकलेली दिसत आहेत. अजून झाली असे मी म्हणत नाही. पण ज्या पद्धतीच्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा मला निवडणूक आयोगाने मागितलेला आहे. ते बघितल्यानंतर निश्चित आम्हाला त्याची काळजी वाटते. चिन्हाची चिंता मी कधी करत नाही. परंतु आज केंद्र शासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचा काम करत आहेत,'' असा हल्लाबोल त्यांनी केला.

''ज्यावेळेला आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री होते त्यावेळेला असे केले जाते. मला आता देशाचे चित्र मोदी सरकारला अनुकूल असे दिसत नाही. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, उडीसा व झारखंड याठिकाणी भाजपची सत्ता नाही. म्हणजेच निवडणुकीच्या पूर्वीच लोकांनी यांची विल्लेवाट कशी करायची याचा विचार केलेला दिसतो.''

''भाजपची (BJP) भूमिका घेणारे जे आहेत ते आमचे नाहीत, राहणार नाहीत व उद्याही राहणार नाहीत. 'इंडिया' म्हणून आम्ही एकत्रितपणे लोकांपुढे जाणार आहोत. महाराष्ट्राच्या तरुणांनी कोणत्या रस्त्याला जायचे ते ठरवले आहे. या निवडणुकीत ते त्यांचा निकाल देतील. महाराष्ट्राच्या जनतेवर आणि तरुण पिढीवर माझा पूर्ण विश्वास आहे. २०२४ ला राज्यातले व देशातले चित्र बदलले पाहिजे त्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील ते आम्ही अखंड करू. माझी चर्चा करून राजकीय निर्णय घेण्याची स्थिती अजून आलेली नाही. आम्ही मिळून 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. आम्हाला या देशात बदल हवा आहे,'' असेही पवार म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT