Ashok Chavan defends Centre on NEET protest Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : कधीकाळी भाजपच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद गमावलं... त्याच भाजप सरकारच्या बचावासाठी अशोक चव्हाण मैदानात

Ashok Chavan, NEET Protest, Parliament: नीट आंदोलनावर अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारची भूमिका मांडत सीबीआय चौकशी, फास्ट ट्रॅक न्यायालय आणि संसदेतील चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचे आवाहन विरोधक व विद्यार्थ्यांना केले.

Jagdish Pansare

NEET Protest : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर २०१० मध्ये आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले होते. चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. या आरोपांनंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत चव्हाण यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली होती. त्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आज तेच चव्हाण भाजपचे राज्यसभेचे खासदार असून आणि त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सरकारची पाठराखण केली आहे.

विरोधकांच्या ताठर भूमिकेमुळे संसदेच्या अधिवेशनाचा पहिला संपूर्ण आठवडा अक्षरशः वाया गेला आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आणि उपोषण या विषयाकडे केंद्र सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. सभागृहात या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चेसाठी सरकार पूर्णपणे तयार असताना, विरोधी पक्षांना मात्र फक्त गोंधळ घालायचा आहे, असा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

नीट पेपरफुटीचे प्रकरण अत्यंत गंभीर असून ते लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे, याची पूर्ण जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. याच पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई होऊन लवकरात लवकर निकाल लागावा, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ ते १४ आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

भविष्यात पुन्हा अशा प्रकारे पेपरलीकचे प्रकार घडू नयेत म्हणून संपूर्ण परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करण्याची सरकारची सकारात्मक तयारी आहे. अशा वेळी विरोधकांनी सभागृहात गोंधळ न घालता सरकारशी चर्चा करायला हवी. सरकारने या प्रकरणात आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. विरोधकांच्या मनात जे काही प्रश्न किंवा शंका असतील, त्यांनी त्या सभागृहात उपस्थित करून उत्तरे मिळवावीत, यासाठी सरकार पूर्णपणे सक्षम असल्याचं त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये, हीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्य भूमिका आहे. केवळ बाहेर गोंधळ न घालता आंदोलनावर योग्य तोडगा काढणे गरजेचे आहे. सरकारने घेतलेल्या प्रामाणिक निर्णयांवर विश्वास ठेवून सोनम वांगचूक यांनी देखील आपले उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सरकारची भूमिका पटवून दिल्यानंतर वांगचूक यांनी एक पाऊल मागे घेतले. त्यामुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी आणि विरोधकांनीही आता आंदोलन थांबवून सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

विरोधक एकीकडे सभागृहात चर्चेला येत नाहीत आणि दुसरीकडे आंदोलकांना भडकवण्याचे काम करत आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे केली आहे. केवळ गोंधळ घालून संसदेचा मौल्यवान वेळ वाया घालवणे योग्य नाही. विरोधी पक्षांनी सभागृहात येऊन प्रश्न विचारावेत, सरकार त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास पूर्णपणे समर्थ आहे, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांना सरकारवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

नीट प्रकरणात केंद्र सरकारने तत्परता दाखवत दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. लोकशाहीत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर गोंधळातून नाही, तर संसदेतील सविस्तर आणि अर्थपूर्ण चर्चेतूनच निघू शकते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित अशा संवेदनशील विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन प्रभावी निर्णय व्हावेत, हीच आज देशाची अपेक्षा आहे, असे ठाम मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT