Mla Rana jagjeetsingh Patil-Tanaji Sawant News
Mla Rana jagjeetsingh Patil-Tanaji Sawant News  Sarkarnama
मराठवाडा

Osmanabad : मंत्रीमंडळात सावतांचे कमबॅक, राणा पाटलांना संधी कधी ?

सयाजी शेळके

उस्मानाबाद : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना स्थान मिळाले असून शिंदे गटाने बाजी मारली आहे. (Osmanabad) मात्र तुळजापूरचे (Rana Jagjeetsingh Patil) आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पदरी निराशा आली आहे. पुढील विस्तारात तरी आमदार पाटील यांना मंत्रीमंडळात संधी मिळणार का? किती दिवस त्यांना मंत्रीपद हुलकावणी देणार? याकडे जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातून एक कॅबीनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या जिल्ह्यात शिंदे गटाने बाजी मारल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील दोन जिल्ह्यात मंत्रीपद मिळाले असून यामध्ये उस्मानाबादला प्रा. सावंत (Tanaji Sawant) यांच्या रुपाने एक मंत्रीपद मिळाले आहे.

सावंत यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्‍वर पाटील यांच्या सहकार्याने प्रथम भैरवनाथ साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात पाऊल ठेवले. शिवजलक्रांतीच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेशी जवळीक साधली. साखर कारखाने तसेच शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून असलेली अर्थसत्ता थेट मातोश्रीच्या जवळची झाली.

तत्कालिन परिस्थितीत जिल्ह्यावर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्षस्व होते. त्यांच्या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी जिल्ह्यातील सेना नेत्यांनी सावंत यांना हाताशी धरले. अखेर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून सावंत यांनी प्रथम विधान परिषदेची आमदारकी मिळविली. त्यांच्या आक्रमक स्वभावाने जिल्ह्यातील तत्कालिन राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलाच वचक बसल्याचे चित्र तयार झाले. त्यामुळे लगेच त्यांना मंत्रिमंडळातही स्थान मिळाले.

अवघ्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुका झाल्या. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मात्र त्यामध्ये सावंत यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी कधी उघडपणे तर कधी अंतर्गतरित्या नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे भाजपसोबत जावून जिल्हा परिषद ताब्यात घेतली. तेव्हापासूनच त्यांचे मातोश्री सोबत असणारे संबंध ताणले गेले.

अखेर भाजपसोबत जाणाऱ्या गटातील प्रमुख शिलेदार म्हणून सावंत यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी शिवसेना फोडाफोडीत मोलाची कामगिरी निभावली असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांचे मंत्रीपद निश्‍चित मानले जात होते. अखेर शिंदे गटातून त्यांनी बाजी मारल्याने त्यांच्या समर्थकांनी जिल्ह्यात जल्लोष केला.

सावंत विरुद्ध शिवसेना संघर्ष उफाळणार

सावंत यांना महाविकास आघाडीपासून दूर ठेवण्यात जिल्ह्यातील सेना नेत्यांचा हात असल्याची भावना सावंतांच्या गोटात होती. आमदार कैलास पाटील हे समर्थक असल्याचे सावंत समजत होते. शिवसेना फुटीनंतर सावंत यांनी आमदार पाटील यांना स्वतःच्या गोटात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सेनेचे (उद्धव ठाकरे समर्थक) कैलास पाटील तसेच खासदार राजेनिंबाळकर हे सावंतांच्या रडारवर असणार आहेत.

जिल्ह्यात भाजपची फारशी ताकद नव्हती. मात्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात नेतृत्व तयार झाले. मंत्रिमंडळाच्या पहिल्या यादीत मात्र आमदार पाटील यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपने सावध भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील सेना खिळखिळी झाल्याशिवाय शिरकाव करता येणार नसल्याचे भाजप नेतृत्व जाणून आहे.

त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष वाढला पाहिजे. प्रथम शिंदे गटाला स्थान देऊन सेनेतील दुफळी वाढवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अशी चर्चा राजकीय गोटात केली जात आहे. तर आमदार पाटील यांना पुढील विस्तारात स्थान देऊन भाजपचे जिल्ह्यातील स्थान अधिक बळकट केले जाऊ शकते. मात्र सध्या सर्वच १८ कॅबीनेट मंत्री असणार आहेत. पुढील विस्तारात भाजप आमदार पाटील यांना स्थान मिळाले तरी कॅबीनट मिळणार की राज्यमंत्री पदावरच त्यांना समाधान मानावे लागणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT