BJP
BJP Sarkarnama
मराठवाडा

Marathwada BJP : राज्यसभेच्या तीन रिक्त जागांवर भाजप कोणाचं चांगभलं करणार?

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीत भाजपचे महाराष्ट्रातील तीन राज्यसभेचे खासदार निवडून गेले आहेत. पीयुष गोयल, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले. राज्यातील या तीन रिक्त जागांवर भाजप आता कोणाचं चांगभलं करणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता भाजप या जागांवर विचारपूर्वक उमेदवार देण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपचे दिग्गज नेते, मंत्री पराभूत झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन भाजप या तीन जागांच्या माध्यमातून करणार का? याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यात भाजपची पुरती नाचक्की झाली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavan यांना मोठ्या अपेक्षेने भाजपने पक्षात घेऊन त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली होती. मात्र ते नांदेडमध्ये भाजपचा पराभव रोखू शकले नाहीत.

दुसरीकडे सलग पाच वेळा लोकसभेच्या जालना मतदारसंघातून निवडून गेलेले, केंद्रात दोनदा राज्यमंत्री राहिलेले, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे Raosaheb Danve हे देखील यावेळी पराभूत झाले.

तिकडे बीडमध्ये आधीच पंकजा मुंडे यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी अन्याय केला, अशी ओरड सुरू होती. ही नाराजी कमी करण्यासाठी यावेळी लोकसभेला भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून पंकजा यांना उमेदवारी दिली. पण त्यांचाही सहा हजार मतांनी पराभव झाला.

पंकजा यांच्या पराभवाने निराश झालेल्या बीड जिल्ह्यातील काही तरुणांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्या. त्यामुळे पंकजा मुंडे Pankaja Munde यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय भाजप श्रेष्ठी घेतील का?

याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार सुरेश धस यांनी तर तातडीने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी राज्यातील पक्ष नेतृत्वाकडे केली आहे.

अशावेळी राज्यातील राज्यसभेच्या रिक्त झालेल्या तीन जागांवर भाजप कोणाकोणाचे पुनर्वसन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपण मागच्या दाराने कुठलेही पद घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. अर्थात पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय घेतला तर ते नकार देऊ शकतील का? हा मोठा प्रश्न आहे.

पकंजा मुंडे यांनी लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसनासंदर्भात कुठलेही भाष्य केलेले नाही. दुसरीकडे राज्यसभेच्या तीन जागा रिक्त असल्या तरी त्यावर वर्णी लावताना प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल.

मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची या जागेवर निवड झाली होती. त्यामुळे या रिक्त जागा निवडून देताना आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असे बोलले जाते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT