Prithviraj Chavan Sarkarnama
मराठवाडा

Prithviraj Chavan: ठाकरेंच्या 'सहानुभूती'वर मोठं भाष्य करतानाच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,'त्यांनी आता आत्मपरीक्षण करावं..!'

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे महाविकास आघाडीचे मनोबल उंचावले आहे. विशेषता काँग्रेसने या निवडणुकीत मोठी बाजी मारली. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी काँग्रेसने सुरु केली आहे. त्यासाठी रणनीती आखली असल्याने त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा करत राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरु असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे.

महाराष्ट्राची एक परंपरा आहे की विरोधी पक्षाची आघाडी असते तेव्हा काँग्रेस कधीही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करत नाही. हे महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्येही आहे. मुख्यमंत्री जर स्वतः निवडणुकीत उतरले तर गोष्ट वेगळी असते. काँग्रेसची (Congress) परंपरा आहे की, निवडणूक झाल्यानंतर जो सर्वात मोठा पक्ष असतो त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. त्यामुळे काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करीत नाही, असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले. (Prithviraj Chavan News)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा परफॉर्मन्स खूप समाधानकारक नव्हता. उद्धव ठाकरेंनी काय चुका झाल्या त्याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आम्हाला विचारले तर आम्ही सांगू शकतो. त्यांच्याविषयी असणाऱ्या सहानुभूतीचा विषय संपला आहे. आता राग आहे तो पक्षांतर केले त्यांच्याबद्दलचा. त्यांच्या मतदारांचा हा प्रश्न असेल की आम्ही विश्वासाने निवडून दिले आणि तुम्ही त्याचा सौदा का केला? असेही पृथ्वीराज चव्हाण फुटलेल्या आमदारांबाबत बोलताना म्हणाले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचितने आमचे काहीच नुकसान केलं नाही. बायपोलर लढाई अनेक ठिकाणी झाली. इंडिया आघाडीची निर्मिती झाल्याने समोरासमोर निवडणूक झाली. इतर राज्यांत आणि महाराष्ट्रात ते घडलं. यावेळी मतविभाजन झाले नाही त्यामुळे आम्हाला जागा जिंकता आल्या. लोकसभेच्या अपयशाचं श्रेय हे मोदींना बऱ्याच प्रमाणात दिलं पाहिजे. कारण त्यांनी अल्पसंख्याकांना टार्गेट केल्याने मतं आमच्याकडे आली, असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पीएम नरेंद्र मोदींनी लोकसभेत 400 पारचा नारा दिला होता. त्यासोबतच संविधान बदलायचं हे त्यांचेच खासदार म्हणाले. त्यामुळेच दोन तृतीयांश बहुमत हवं होतं. तो मुद्दा लोकांच्या मनात गेला. फेक नरेटिव्ह नव्हते ते भाजपाने सुरु केले होतं जे त्यांच्या अंगलट आले, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीत जागावाटपावरून थोडेसे मतभेद झाले होते. सांगलीच्या बाबतीत जर आम्ही ताणलं असतं तर तुटलं असतं. दिल्लीतून आम्हाला सांगण्यात आलं होतं की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी फुटू देऊ नका. त्यामुळे एखादं पाऊल आम्ही मागे घेतलं आणि आघाडी मजबूत ठेवली. राष्ट्रवादी काँग्रेससह भिवंडीच्या जागेवर वाद झाला. या निवडणुकीलाही आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT