Raj Thackeray  Sarkarnama
मराठवाडा

Raj Thackeray News : राज ठाकरेंनी धाराशिव दौरा घेतला आटोपता; तासाभरातच चार मतदारसंघाच्या बैठका संपवल्या

Sachin Waghmare

Dharshiv News : मराठा व ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्यात गेल्या काही दिवसापासून पेटला आहे. मराठवाड्यात होत असलेल्या आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याचीही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले. त्यामुळे सोमवारी ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जवळपास साडेतीन तास आंदोलन केले.

आंदोलनामुळे मंगळवारी सकाळी मनसेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांनी धाराशिव दौरा घेतला आटोपता घेतला. धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाच्या बैठका केवळ तासभरातच त्यांनी उरकल्या. त्यानंतर दोन दिवसाचा धाराशिव जिल्हा दौरा संपवून लातूरकडे रवाना झाले. यावेळी थांबलेल्या हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाकरे यांनी या ठिकाणी बोलावलेली नियोजित पत्रकार परिषद देखील रद्द केली. (Raj Thackeray News)

सोमवारपासून राज ठाकरे यांच्या मराठवाडयातील दौऱ्याची सुरुवात धाराशिवमधून केली. यावेळी त्यांनी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास धाराशिवमध्ये मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये पोचले होते.

यावेळी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, असा आग्रह करत मराठा आरक्षण आंदोलकांनी हॉटेलमध्ये प्रवेश करीत जवळपास साडेतीन तास आंदोलन केले. त्या हॉटेलमध्ये घुसून आंदोलकांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली होती. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा राज ठाकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.

त्यानंतर मंगळवारी राज ठाकरे यांनी दुसऱ्या दिवशीचा धाराशिव दौरा आटोपता घेतला. धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा आढावा तयांनी अवघ्या तासभरात घेतला. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद देखील बोलवली होती. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद रद्द केली.

यावेळी राज ठाकरे थांबलेल्या हॉटेल परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसाचा धाराशिव जिल्हा दौरा संपवून ते लातूरकडे रवाना झाले. लातूरमध्ये त्यांचा मंगळवारी मुक्काम असणार आहे. बुधवारी सकाळी ते लातूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक रिंगणात मनोज जरांगे हे उतरणार आहेत. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे विधान केले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा प्रश्न हा मुद्दा ऐरणीवर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT