Minister Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve On PMAY News : घरकूल घोटाळ्याचे दानवेंनी केले असे वर्णन, की अधिकारी चक्रावलेच.. .

Marathwada News : `हुंडा दिला, पण लग्नच झाले नाही`, अशी स्थिती असल्याचा टोला लगावला.

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : पंतप्रधान आवास योजनेचा निविदा घोटाळा पुन्हा एकदा आज झालेल्या दिशा नियोजन समितीच्या बैठकीत गाजला. (PMAY News) महापालिकेने राबविलेल्या निविदेचा घोटाळा म्हणजे `हुंडा घेतला पण लग्नच झाले नाही`, असा असल्याचे सांगत समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रशासनाला सुनावले. महापालिकेने ज्या प्रकारे निविदा काढली आहे, त्यापद्धतीने देशात कुठेही योजना राबविण्यात आलेली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

स्मार्ट सिटी कार्यालयात केंद्र व राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी दिशा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दानवे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. घरकुल निविदा घोटाळ्याचे वर्णन दानवे यांनी आपल्या अस्सल ग्रामीण ढंगात केले, ते ऐकून अधिकारी तर चक्रावूनच गेले. (Municipal Corporation) मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, आमदार हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत पंतप्रधान आवास योजनेचा विषय गाजला.

आवास योजनेला २०१६ मध्ये सुरवात झाली, पण अद्याप महापालिकेने एकही घर बांधलेले नाही, अशी खंत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी व्यक्त केली. ४० हजार घरांचा डीपीआर कोणत्या आधारावर केला? एकीकडे लाभार्थी ठरविण्यासाठी जाहिरात काढता, दुसरीकडे घरांची संख्या आधीच कशी ठरवता? असा प्रश्‍न दानवे यांनी केला. (Aurangabad) महापालिकेला राज्य शासनाने १२६ हेक्टर जागा दिली, पण यातील ९० हेक्टर जागा निरुपयोगी असताना निविदा प्रक्रिया का राबविली? असा सवाल आमदार बागडे यांनी केला.

३६ हेक्टर जागेवरच घरे विकसित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तर निविदा घोटाळ्याची ईडी मार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीचे पुढे काय झाले? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला. त्यावर महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी या प्रकरणात निविदाधारकावर गुन्हा दाखला झाला आहे, त्यात अधिकाऱ्यांचा समावेश नाही, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी लग्नच झाले नाही, आणि आपण अपत्याविषयी चर्चा करत आहोत, अशी टिप्पण्णी केली.

त्यावर कोटी करत रावसाहेब दानवे यांनी `हुंडा दिला, पण लग्नच झाले नाही`, अशी स्थिती असल्याचा टोला लगावला. घरांच्या किमती किती राहणार? असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. म्हाडाच्या घराच्या किंमतीपेक्षा जास्त किंमत असेल तर घरे कोण घेणार ? म्हाडाच्या घरांना देखील ग्राहक मिळत नाही, तर आवास योजनेसाठी लाभार्थी कसे मिळतील? यासह अनेक प्रश्‍न लोकप्रतिनिधींनी यावेळी केले. रावसाहेब दानवे यांनी योजनेचे पैसे बोगस लाभार्थींच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत, मला बोलायला भाग पाडू नका, माझ्याकडे पुरावे आहेत, असा दावा केला. त्यावर अधिकारी शांत झाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT