Mp Imtiaz Jalil, Aurangabad
Mp Imtiaz Jalil, Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

Imtiaz Jalil : संभाजीनगर, औरंगजेब विषयावर बोलणार नाही ; माझ्यासाठी पाणी प्रश्न महत्वाचा..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शहराचे नाव संभाजीनगर कधी होणार, औरंगजेबच्या कबरीवर फुलं का वाहिली, ज्ञानवापी मशिदीचे काय? या कुठल्याच प्रश्नावर मी बोलणार नाही. (Aimim) माझ्यासाठी शहराच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, असे सांगत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी वादग्रस्त विषयावर न बोलण्याची भूमिका घेतली. योग्यवेळी राज ठाकरे, फडणवीस, उद्धव ठाकरे या तिघांपेक्षाही चांगल्या पद्धतीने मी उत्तर देईन, कारण जीभ माझ्याकडेही आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला.

शहरातील पाणी प्रश्नावरून सध्या सत्ताधारी व विरोधक यांच्यात संघर्ष सुरू आहे. मनसेने संघर्ष यात्रा सुरू केली आहे, तर २३ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीत भाजप महापालिकेवर हंडामोर्चा काढणार आहे. (Aurangabad) या पार्श्वभूमीवर नेमकी एमआयएमची भूमिका काय ? हे जाणून घेण्यासाठी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी इम्तियाज जलील यांना काही प्रश्न उपस्थितीत केले.

तत्पुर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानात झालेल्या सभेत उद्धव ठाकरे आणि काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबच्या कबरीचे ओवेसींनी घेतलेले दर्शन यावरून प्रश्न उपस्थीत केला. यावर इम्तियाज जलील म्हणाले, ज्यांना इतिहास माहित नाही ती लोक घाणेरडं राजकारण करत आहे. ज्ञानवापी मशिद, औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार? औरंगजेबच्या कबरीवर माथा का टेकवला? या प्रश्नावर मी बोलणार नाही.

कारण त्यापेक्षा माझ्या शहरातील नागरिकांना नियमित पाणी कसे मिळेल? हे माझ्यासाठी महत्वाचे आहे. पाणी प्रश्न न सोडवता शिवसेनेचे पालकमंत्री पाणीपट्टी ५० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे मोठ्या फुशारकीने सांगतात. पण माझे म्हणणे आहे नागरिक तुम्हाला पुर्ण पाणीपट्टी द्यायला तयार आहेत, तुम्ही पाणी देणार का? हे सांगा. इतकी वर्ष महापालिकेत सत्ता होती, तेव्हा तुम्ही काय केले? फडणवीस पण हंडा मोर्चा काढणार आहेत, त्यांच्या पक्ष देखील शिवसेनेसोबत सत्तेत होता, त्यांचाही महापौर होता, मग तेव्हा झक मारत होते का?

फक्त निवडणुका आल्या की पाण्याची, संभाजीगनरची, औरंगजेबाची आठवण यांना कशी येते? असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. समांतर जलवाहिनी भाजपच्या राज्यसभेतील एका उद्योगपती खासदाराला फायदा पोहचवण्यासाठी आणण्यात आली होती. या कंपनीला काम मिळावे यासाठी तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना कमीशन देण्यात आले होते. आता पुन्हा नवीन योजना आणली आहे, पण ही देखील आणखी तीन वर्ष पुर्ण होण्याची शक्यता नाही.

हैदराबादच्या ज्या कंपनीला पाणी योजनेचे काम देण्यात आले आहे, त्याने मला सांगितले की मुख्यमंत्र्यांचे असे आदेश होते, की निवडणुका येतायेत लवकर काम सुरू करा. म्हणजे लोकांना पाणी मिळावे याला प्राधान्य देण्याऐवेजी तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेत आहात, असा आरोप देखील इम्तियाज यांनी ठाकरे सरकारवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT