Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagar
Jaydatta Kshirsagar |Sandeep Kshirsagar sarkarnama
मराठवाडा

Sandeep Kshirsagar Vs Jaidatta Kshirsagar: जयदत्त क्षीरसागर शरद पवार गटाच्या संपर्कात..? आमदार क्षीरसागर म्हणाले...

Deepak Kulkarni

Beed News : आमदार आणि मंत्री राहिलेल्या आणि बीडच्या राजकारणात मोठा दबदबा राहिलेले जयदत्त क्षीरसागर गेल्या दोन वर्षे वर्षांपासून कोणत्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हते. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यानंतर क्षीरसागर यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकता वाढवली असल्याचे बीडच्या राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मात्र, लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि बीडमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं आहे. त्यामुळे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाशी सलगी वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात.पण आता याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठं विधान करत काकालाच डिवचलं आहे.बीडमध्ये पत्रकार परिषद घेत काका जयदत्त क्षीरसागर यांनाच आमदार व पुतण्या संदीप क्षीरसागरांनी (Sandeep Kshirsagar) लक्ष्य केले.

बीड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले,आमचे काका निवडणुका आल्या की सक्रिय होतात. आता ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु,मी एक पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून हे जबाबदारीने सांगू शकतो की, या निव्वळ अफवाच आहेत, असा कोणताही प्रकार नसल्याचा खुलासा आमदार क्षीरसागरांनी केला आहे.

बीडमधून संदीप क्षीरसागर आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात. जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली, तर पुतण्याचं काय? आणि संदीप क्षीरसागर यांना पुन्हा संधी दिली तर काकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होणार आहे. काका-पुतणे एकत्र आले तर दोघांनाही त्याच तोडीची पदे देण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे.

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, काका जयदत्त क्षीरसागर निवडणुका आल्या की सक्रिय होतात. परंतु पडल्यानंतर ते चांगल्या पद्धतीने काम करतात असा चिमटाही त्यांनी काढला. बीडमध्ये केवळ श्रेयवादाचे राजकारण सुरू असून प्रत्यक्षात कामं मात्र होत नाही. ही दुर्दैवी बाब असून आम्ही पाठपुरावा करत असलेल्या कामे अडवून भेदभावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेतली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT