Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News Sarkarnama
मराठवाडा

Sambhajinagar Water Crisis : संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर सत्ताधारी मस्त, तर विरोधक सुस्त!

Sambhajinagar Water Crisis Ruling Party Unbothered, Opposition Silent: समांतर जलवाहिनीला एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात तर इम्तियाज जलील यांनी आमदार म्हणून सभागृहाबाहेर कडाडून विरोध केला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : संभाजीनगरचा पाणी प्रश्न ऐन उन्हाळ्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. महापालिकेत या प्रश्नावर गेली अनेक वर्ष सत्ताधारी मस्त, तर विरोधक सुस्त अशी परिस्थिती राहिली. शिवसेना-भाजपाच्या सत्ता काळापैकी मागील पाच वर्ष महापालिकेत एमआयएम पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होता. पण त्यांच्या नगरसेवकांनाही नागरिकांच्या पाणी प्रश्नापेक्षा 'वंदे मातरम'सारखे विषय महत्वाचे वाटले.

कधी कधी तर सत्ताधारी आणि विरोधकांची मिलीभगत आहे की काय? अशी शंकाही उपस्थित केली जात होती. समांतर जलवाहिनीला एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सभागृहात तर इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी आमदार म्हणून सभागृहाबाहेर कडाडून विरोध केला. समांतर जलवाहिनीचे तोटे, नागरिकांवर पाणी पट्टीचा बोजा कसा वाढेल? या मुद्यावरून तेव्हा त्यांनी रान उठवले. समान पाणी वाटपाचा त्यांनी धरलेला आग्रहही योग्य वाटला.

त्यामुळे संमातर घालवण्यात जसा सत्ताधारी पक्षाचा वाटा होता, तसा तो एमआयएम आणि इम्तियाज जलील यांचा देखील होता. इम्तियाज जलील हे महापालिकेच्या राजकारणात नव्हते, नशिबाने त्यांना थेट आमदारकी आणि त्यानंतर लगेच खासदारकी मिळाली. एक अभ्यासू, हजरजबाबी आणि जनतेच्या प्रश्नांची जान असणारा सुशिक्षित खासदार अशी इम्तियाज जलील यांची ओळख आहे. पण शहाराच्या पाणी प्रश्नावर (Water Crisis) ते आणि त्यांचा एमआयएम हा पक्षही अपयशी ठरले असेच म्हणावे लागेल.

एकवेळा आमदार, खासदार राहिलेले इम्तियाज जलील यांनी शहरातील पाणी प्रश्नावर संसदेत उठवलेला आवाज नागरिकांनी पाहिला, पण तो संबंधित यंत्रणेपर्यंत पोचलाच नाही. इकडे महापालिकेत त्यांच्या एमआयएम पक्षाने समान पाणी वाटपाचा मुद्दा चर्चेत आणला, पण पुढे या मुद्द्यावर पाणी फेरले गेले. पंचवीस नगरसेवकांची ताकद हाती असताना एमआयएमने पाण्यासाठी रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांना जाब का विचारला नाही? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

रिक्षाचालक ते पालकमंत्री झालेले शिरसाटही फेल..

महापालिकेच्या राजकारणात सुरवातीपासून सक्रीय असलेले आणि नगरसेवक पदापासून श्रीगणेशा करणारे विद्यमान पालकमंत्री संजय शिरसाट हे ही पाणी प्रश्नावर फेल ठरले. रिक्षाचालक, कंपनी कामगार ते नगरसेवक, आमदार अन् आता मंत्री पदापर्यंत पोहचलेले शिरसाट पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केलेल्या आंदोलनावर टीका करत आहेत. हे आंदोलन म्हणजे स्टटंबाजी असल्याचे सांगत आहेत. मात्र सलग चार टर्म शहराचाच भाग असलेल्या पश्चिम मतदारसंघातून आमदार झालेले शिरसाट पाणी प्रश्नावर याआधी फारसे कधी बोलताना दिसले नाही.

आता सत्तेत असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची बाजू घेतानाही त्यांची दमछाक होत आहे. शिवसेनेचे आंदोलन आणि स्टटंबाजी हा वेगळा विषय ठरू शकतो. पण संभाजीनगरकरांचा पाणी प्रश्न हा आजचा नाही तर तुम्ही महापालिकेत नगरसेवक किंवा त्याहीआधीपासूनचा आहे. आणि आता तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री झालात तरी तो कायम आहे. विरोधकांवर टीका करा, पण तुम्ही पाणी प्रश्नासाठी काय केले? ते ही सांगा, असा जाब संभाजीनगरची जनता आज विचारत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT