<div class="paragraphs"><p>Mla Tanaji Sawant</p></div>

Mla Tanaji Sawant

 

Sarkarnama

मराठवाडा

सावंतांचा भाजप प्रवेश ठरणार `एकला चलो रे`, जिल्ह्यातून कोणाचीच साथ नाही..

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद ः शिवसेनेचे माजी मंत्री आणि भूम-परांड्याचे विद्यमान आमदार तानाजी सावंत सध्या चागंलेच चर्चेत आहेत. (Mla Tanaji Sawant) हिवाळी अधिवेशना दरम्यान, तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सांवत यांनी भेट घेतली. (Shivsena) या भेटीमुळे ते भाजपमध्ये (Bjp) जाणार अशा चर्चांना उधाण आले.

पण या भेटीचा पक्षश्रेष्ठी किंवा नेतृत्वावर काहीच फरक पडला नाही, म्हणून की काय त्यांनी काल भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आपल्या कात्रज येथील निवासस्थानी बोलावून त्यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा केली. मराठवाड्यातील भूम-परांडा आणि सोलापूर जिल्ह्यात सावंत यांचा चांगला प्रभाव आहे. भक्कम आर्थिक बाजू आणि त्या जोरावार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गोतावळा जमवत त्यांनी या दोन्ही जिल्ह्यात आपली राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे.

साखर कारखानदारीत जम बसवलेल्या तानाजी सांवत यांना शिवसेनेने सुरूवातीला झुकते माप दिले. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हा समज आणि त्याची जाहीर वाच्यता सावंत करू लागल्याने पक्षातील निष्ठावान कमालीचे दुखावले गेले. पण मातोश्रीवर वजन असलेल्या सावंत यांनी जिल्ह्यातील गोतावळा वगळता इतर शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची फारशी कधी पर्वा केली नाही.

लोकप्रतिनिधी, आमदार यांनी देखील नेता म्हणून त्यांना मान दिला असला तरी मनापासून ते कधी त्यांच्यासोबत नव्हते हे वारंवार दिसून आले होते. त्यामुळे सावंत यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यानंतर ते शिवसेनेला खिंडार पाडणार का? मराठवाडा किंवा स्वतःच्या सोलापूर जिल्ह्यात ते पक्षाला किती नुकसान पोहचवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु वस्तुस्थिती पाहिली तर सावंत यांचा भाजपमधील प्रवेश हा `एकला चलो रे`, च ठरण्याची अधिक शक्यता आहे.

भूम-परांडा विधानसभा मतदारसंघात काही शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपची वाट धरू शकतात, पण आजी-माजी आमदार किंवा एखादा मोठा लोकप्रतिनिधी सावंतांचे बोट धरून पक्ष सोडेल अशी अजिबात शक्यता नाही. हीच परिस्थिती सावंत यांची त्यांच्या सोलापूर जिल्ह्यात देखील आहे.

सावंत यांच्याकडे पक्षाने जेव्हा जिल्ह्याचे नेतृत्व सोपवले होते तेव्हा तिथे झालेली बंडाळी सगळ्यांनी पाहिली. शेवटी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना मुंबईतून येऊन हा वाद मिटवावा लागला होता. तर अशीच काहीसी परिस्थिती उस्मानाबाद जिल्ह्यात देखील आहे. पक्षातील एक वजनदार नेता म्हणून त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात जिल्ह्यातील काही आजी-माजी आमदारांचा सावंत यांच्यांशी जवळून संबंध आला आहे.

परंतु असे असले तरी सावंत यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर मात्र हे पदाधिकारी त्यांची साथ सोडतील हे निश्चित आहे. २०१९ मध्ये सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने सावंत यांच्यावर सोपवली होती, पण शहाजी पाटील हे एकमेव आमदार जिल्ह्यातून निवडून आणण्यात सावंत यांना यश आले होते.

पाटील हे सावंत यांच्या प्रभावाखाली असले तरी त्यांच्या सांगण्यावरून तेही पक्ष सोडतील, अशी स्थिती नाही. सावंत यांच्या पैशाची आणि संघटनेतील प्रभावाचा विचार केला तर ते शिवसेनेला फारशे फायद्याचे ठरले असे चित्रही नाही. त्यामुळे सावंत यांच्याकडे दुर्लक्ष करणे आणि त्यांचा मार्ग मोकळा करणे, असेच धोरण वरिष्ठांनी ठरवल्याचे दिसते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT