Ncp Leader Sharad Pawar
Ncp Leader Sharad Pawar Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : अनेकांना पद आणि अधिकार याचे तारतम्य राहत नाही..

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : `पदावर बसलेल्या लोकांना पद आणि अधिकार यांचे तारतम्य राहत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावर टिका केली. (Osmanabad) उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी (आ) येथील कार्यक्रमात ते रविवारी (ता. सहा) बोलत होते. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले, लहान कार्यक्रमाला मी का आलोय? असे काहीजणांना वाटत असेल. पण, राज्य चालवायचे असेल, राज्याच भविष्य उत्तम घडवायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. मी स्वतः गेली ५२ वर्षे जनतेसाठी काम केले. चार वेळा मुख्यमंत्री झालो, केंद्रात मंत्री झालो. आता मला स्वतःसाठी काहीच नको आहे. प्रत्येक पुरुषाच्या कर्तत्वामध्ये महिलेचा हातभार असतो. जिजामातेने छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तत्व घडविले. सावित्रीबाईंच्या विचारातून स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. रमाबाईंनी बाबासाहेबांना घडविले.

कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषानी घेतला नाही. महिलाही त्यामध्ये कधीच मागे नाहीत. कर्तृत्वाला संधी दिली पाहिजे, असे म्हणत पक्षाच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या कार्याचा गौरव म्हणून इथे आल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. जोपर्यंत तुमची साथ मिळेल तोपर्यंत हे गाडं चालत राहणार, असेही पवार यावेळी म्हणाले. या जिल्ह्याने अनेक वेळा साथ दिली आहे. जे लोक गेले त्यांची चिंता करायची नाही, गेले ते गेलेच असे म्हणत भाजपमध्ये गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावरही पवार यांनी टिका केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. दिल्लीमध्ये मोघलांचे राज्य होते. तर कुठे कुतुबशाही, कुठे मोघलशाही, देवगिरी यादव असे त्या-त्या काळात राज्यकर्ते झाले. पण, छत्रपतींनी भोसल्यांचे राज्य केले नाही. हिंदुस्थानातील लोकांच्या मनामध्ये स्वतंत्र राज्य असावे म्हणून छत्रपतीनी जनतेचे हिंदवीराज्य उभं केले.

संकटात राजकारण आणणार नाही..

मराठवाड्यातील आणि प्रामुख्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे कृष्णा खोऱ्याचे पाणी होय. त्यासाठी मी जयंत पाटील यांना आताच फोन केला. या पाण्याच्या कामाचे तीन ते चार आठवड्यात टेंडर निघणार आहे. त्यामुळे लवकरच आता हे पाणी येथील जनतेला मिळेल. देश संकटातुन जात आहे. संकटावेळी जनतेला धीर द्यायचा असतो. युध्द सुरु आहे. आपल्या देशातील हजारो विद्यार्थी तिथे अडकून पडले आहेत. त्यांना जेवण नाही, असुरक्षित परिस्थितीमध्ये आहेत. यामध्ये राजकारण न करता एकत्र आले पाहिजे.

युद्धामुळे महागाईचे संकट यामुळे निर्माण होणार आहे. हे राज्य एका विचाराने जायला हवे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळ चांगले काम करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. `मी येणार, मी येणार` मी येणार` पण, आम्ही येऊ देतो का? असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी यावेळी निशाना साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT