Ncp Leader Sharad Pawar-Mp Imtiaz Jalil
Ncp Leader Sharad Pawar-Mp Imtiaz Jalil Sarkarnama
मराठवाडा

ज्या शरद पवारांच्या मुलाखतीसाठी तीन तास ताटकळायचो, आज त्यांच्या बाजूला बसतो

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः एमआयएम पक्षासाठी वेड्यासारखे झटणारे तुमच्या सारखे हजारो कार्यकर्ते आणि देवाचे आशिर्वाद यामुळेच मी दिल्लीत जाऊ शकलो. सात वर्षापुर्वी पत्रकार म्हणून काम करतांना ज्या शरद पवारांची मुलाखत घेण्यासाठी मी तीनतीन तास ताटकळत थांबायचो, त्याच पवारांच्या बाजूला आज मी बसतो. हे सगळ तुमच्या आणि देवाच्या आशिर्वादामुळे घडले. राष्ट्रवादी व काॅंग्रेस पक्षाने मुसलमानांचा फक्त सत्तेसाठी वापर करून घेतला.

शरद पवारांनी कधी एखाद्या मुसलमानाला तुला, खासदार, आमदार करतो असे सांगितले नाही, अजित पवारांनी कधी तुम्ही लढा आम्ही तुम्हाला निवडून आणतो असे म्हटले नाही. त्यांनी मुसलमानांना फक्त नगरसेवक पदापुरते मर्यादित ठेवले. मंत्री, आमदार, खासदार ही सत्ता त्यांनी उपभोगली आणि मुसलमांना फक्त सतरंज्या उतरायला लावल्या.

पण नशिबाने आज आम्हाला तुमच्या बाजूला आणून बसवले, असे सांगत भविष्यात एमआयएम आपल्या ताकदीच्या जोरावर संपुर्ण महाराष्ट्रात आपला झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला. एमआयएमच्या वतीने शहरात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्याच्या समारोपासाठी २९ रोजी खासदार असदोद्दीन ओवेसी शहरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या कार्यकर्ता मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. इम्तियाज जलील यांनी काल या मेळाव्याला मार्गदर्शन केले. पक्षातील वाद, टीका आणि वैयक्तिक त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांना इम्तियाज यांनी सडेतोड उत्तरे दिली.

पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आमदार, खासदार, नगरसेवक होण्याची इच्छा, महत्वाकांक्षा बाळगण्यास देखील गैर नाही, ही स्पर्धा असलीच पाहिजे, पण त्यासाठी आपण पक्षासाठी काय केले हे प्रत्येकाने आधी तपासावे मगच दावा करावा. पक्षाने दिलेले पद हे मिरवण्यासाठी नाही, तर पक्षाला बळकट करून ओवेसी यांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्यासाठी आहे. त्यामुळे जो काम करेल तो राहील, जो करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवला जाईल असेही, इम्तियाज यांनी स्पष्ट केले.

एमआयएम पक्षात अंतर्गत गटबाजी वाढू लागली आहे. इम्तियाज जलील यांच्या भाषणातून ते प्रकर्षाने ते जाणवले. मग तो पोस्टरवरील फोटो न छापल्याबद्दलचा वाद असो की इम्तियाज जलील हे संपत्ती खरेदी करत असल्याचा आरोप. या सगळ्यांवर इम्तियाज जलील यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.

इम्तियाज जलील म्हणाले, औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवण्याचा जेव्हा विचार झाला तेव्हा अनेकांनी ओवेसी यांना आपण दीड लाखांपेक्षा जास्त मतं घेऊ शकत नाही असे सांगितले होते. मला स्वतःला हा मतदारसंघ किती मोठा आहे, यात कुठला भाग येतो हे माहित नव्हते. पण मी कुठलाही निर्णय हा देवाला साक्षी ठेवून घेतो, तसाच निर्णय मी लोकसभा निवडणूक लढवण्या संदर्भात घेतला.

एका क्षणात दूर होईन

पंधरा दिवसांत आमदार होणारा माणूस पुन्हा असाच खासदार झाला आणि दिल्लीला गेला. हे माझ्या एकट्याचे यश नाही, तर तुमच्या सगळ्यांची मेहनत आणि आशिर्वाद माझ्यासोबत असल्याने शक्य झाले. आमदार झालो, खासदार झालो आता अनेकांना आपण लढावे अशी इच्छा आहे. अशी इच्छा असण्यात गैर नाही, मीच कायम आमदार, खासदार राहीन हे ठरवून राजकारणात आलेलो नाही.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जर असदोद्दीन ओवेसींनी सांगितले की इम्तियाज अब तुम नही, कोई और, तर एका क्षणात बाजूला होईल, असे इम्तियाज यांनी स्पष्ट केले. दावेदारी करण्याआधी स्वतःला सिद्ध करा, पक्षासाठी दिवसरात्र झटा, असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT