Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News
Minister Raosaheb Danve-Cm Eknath Shinde News  Sarkarnama
मराठवाडा

`जिसकी जितनी संख्या , उसकी उतनी भागिदारी`, शिंदेचीच शिवसेना खरी ; दानवेंचा दावा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद सर्वोच्च न्यायालयात काय आहे ? यावर मी भाष्य करणार नाही, ते योग्यही नाही. पण लोकशाहीत संख्या, बहुमताला महत्व असते. ते पहाता ` जिसकी जितनी संख्या अधिक, उसकी उतनी भागिदारी`, त्यानूसार शिंदे यांच्याकडे ५४ पैकी ४० आमदार म्हणजेच बहुसंख्य आहेत. त्यामुळे त्यांचीच (Shivsena) शिवसेना खरी असे आम्ही मानतो. शिवसेना फोडण्यात भाजपचा कोणताही हात नाही, उलट आमच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे सरकार स्थापन झाले असून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे, अशी गुगली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी टाकली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी, (Eknath Shinde) शिंदे विरुद्ध ठाकरे असा सर्वोच्च न्यायालयात पोहचलेला वाद यावर रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत भाष्य केले. राज्यात जे महाभारत घडले आहे, शिवसेनेचे आमदार नाराज होऊन बाहेर पडले, त्याला संजय राऊत हेच जबाबदार आहेत, असे मी नाही तर शिवसेनेचेच आमदार म्हणत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला.

रावसाहेब दानवे म्हणाले, मुळात शिवसेने मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी महाराष्ट्रातील जनमताचा अपमान केला. शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढले होते. मतदारांनी कोणत्याही एकट्या पक्षाला नाही तर युतीला बहुमत दिले होते. पण उद्धव ठाकरे यांनी न दिलेल्या शब्दाचे खापर भाजपवर फोडत काॅंग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. हे शिवसेनेतील आमदार आणि राज्यातील जनतेला देखील पटले नव्हते, त्याचाच परिणाम शिवसेना फुटण्यात झाला आहे.

भाजपने सुरूवातीपासूनच स्पष्ट केले होते, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार फोडण्यात रस नाही. अंतर्गत विरोध आणि तीन पक्षाच्या सरकारमध्ये समन्वय नसल्यामुळेच शिवसेनेचे आमदार मोठ्या नाराजीतून बाहेर पडले. उद्धव ठाकरे यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कोणताही शब्द दिला नव्हता, याचा पुनरुच्चार देखील दानवे यांनी केला. मातेश्रीवर युतीची बोलणी करण्यासाठी झालेल्या बैठकीच्यावेळी अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे दोघे स्वंतत्रपणे एकमेकांशी बोलले होते.

यावेळी झालेले बोलणे नंतर आम्हाला सांगण्यात आले, तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा विषय निघाला तेव्हा ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांच्या काळात ठरलेला फाॅर्म्युलाच आताही लागू राहील असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु सरकार आपल्याशिवाय बनणनार नाही हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे यांनीच शब्द फिरवला, असा दावा देखील दानवे यांनी केला. शिवसेनेतील १२ खासदारांच्या गटाला आणि नेत्याला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली ती संख्याबळाच्या आधारावर आणि कायद्यानूसारच दिल्याचेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT