Mahavikas Aghadi Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : उद्धवसेनेचे पराभूत उमेदवार म्हणतात महाविकास आघाडीतून बाहेर पडा

Uddhav Thackeray's candidates demand exit from Maha Vikas Aghadi after defeat in the Assembly : उद्धव ठाकरे यांनी तूर्तास हा विषय बाजूला ठेवा त्यावर काय निर्णय घ्यायचा ते नंतर ठरवू, असे सांगतिले. आपापल्या मतदारसंघात ईव्हीएम वर आक्षेप नोंदवत फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करा, अशा सूचना दिल्या.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. विशेषता ज्या मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आठ पैकी सात जागा मिळाल्या होत्या त्या भागातही महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पराभूत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची बैठक काल मुंबईत बोलवण्यात आली होती.

पराभवा मागची कारणे जाणून घेताना अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडा, असा सूर निघाला. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी तूर्तास हा विषय बाजूला ठेवा त्यावर काय निर्णय घ्यायचा ते नंतर ठरवू, असे म्हणत आपापल्या मतदारसंघात ईव्हीएम वर आक्षेप नोंदवत फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल करा, अशा सूचना पराभूत उमेदवारांना दिल्या.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पाच टक्के ईव्हीएम मधील मतांची मोजणी करता येते. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराने फेर मतमोजणीसाठी अर्ज करावेत,असे या बैठकीत सांगण्यात आले. (Mahavikas Aghadi) पराभवाची कारणे स्पष्ट करताना अनेक उमेदवारांनी मित्र पक्षांनी आपल्याला साथ दिली नाही, असा आरोप करत आता थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडा,अशी मागणी केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्य आणि पश्चिम चे उमेदवार बाळासाहेब थोरात, राजू शिंदे यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त करत अनेक भागात मोठ्या प्रमाणात मतदान झालेले असतानाही ते आपल्या नावावर कसे आले नाही? असा प्रश्न उपस्थित करत शंका व्यक्त केली.

याशिवाय हिंदुत्वाच्या विचारांपासून आपला पक्ष दूर गेल्याची टीका लोक करत होते,असेही या बैठकीत मांडण्यात आले. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी एका बुथ चे उदाहरण सांगत आपल्याला तिथे फक्त 133 मते मिळाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे या भागात आपले समर्थक आणि पक्षाची मोठी ताकद असताना एवढी कमी मते मिळणे शक्यच नसल्याचा दावा त्यांनी केला.

मध्य मधील बाळासाहेब थोरात यांनी ज्या हरसुल भागात आपण पदयात्रा आणि घरोघरी जाऊन भेटीगेट घेतल्या त्या सर्वांनी मतदान शिवसेना म्हणजेच आपल्याला केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात मात्र हे मतदान आपल्याला झाल्याचे दिसत नाही.मतदार मात्र मतदान केल्याचे ठामपणे सांगत असून शपथ पात्र लिहून द्यायला तयार असल्याचे सांगितले. एकूणच उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत पराभूत उमेदवारांनी नाराजीचा सूर काढला.

तसेच महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाची मते आपल्याकडे वळली नाही. त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपले कामही केले नाही, असा आरोप सर्वच पराभूत उमेदवारांनी केला. या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत काही उमेदवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्याचे सांगत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असली तरी आम्ही महाविकास आघाडी सोबतच राहणार आहोत, असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT