पालकमंत्री संजय शिरसाट यांनी महापालिकेची इमारत कब्रस्तानाच्या जागेवर असल्याचा दावा केला.
या कारणामुळे पालिकेला ‘ग्रहण’ लागल्याचे आणि कर्मचाऱ्यांना बेचैनी जाणवत असल्याचे त्यांनी म्हटले.
इमारत दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा सल्ला देत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत ज्या जागेवर उभी आहे, तो भाग कब्रस्तानचा आहे. इथे मुडदे गाडले जायचे, त्यामुळे महापालिकेला ग्रहण लागले आहे. इथे आत्मे दिसतात, तुम्हाला बेचैन होते. यातून मुक्ती हवी असेल तर महापालिकेची इमारत चांगल्या जागेवर बांधा असे विधान पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील एका कार्यक्रमातच संजय शिरसाट यांनी महापालिकेला ग्रहण लागल्याचे सांगत वरील विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. गेल्या 20-25 वर्षात महापालिकेच्या राजकारणात शिवसेना हा मोठा भाऊ म्हणून वावरत होता. महापौर, स्थायी समिती सभापती अशी सगळी महत्वाची पदं शिवसेनेकडे असायची. परंतु नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही. या पक्षाचे फक्त 13 नगरसेवक निवडून आले.
भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत महापालिकेत शतप्रतिशत सत्ता आणली. शिवसेनेला छोट्या भावाच्या भूमिकेत जावे लागले. जिल्ह्यात एक खासदार, सहा आमदार, पालकमंत्री पद असताना पक्षाची झालेली ही दुरावस्था पाहता संजय शिरसाट यांना जबाबदार धरले जात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या दौऱ्यातही शिरसाट यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा पदाधिकारी, शिवसैनिकांकडून वाचला गेला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील परिस्थिती संदर्भात शिरसाट यांनी वरील विधान केले असावे असे बोलले जाते.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेला ग्रहण लागले आहे. पालिकेला ग्रहण लागण्याचे कारण महापालिकेची ही इमारत ज्या जागेवर उभी आहे,तिथे मुडदे गाडले जायचे. कब्रस्तानचा हा भाग असल्याने इथले आत्मे तुम्हाला दिसतात आणि तुम्ही बेचैन होता. यातून मुक्ती हवी असेल तर इमारत चांगल्या ठिकाणी बांधा, असा सल्ला शिरसाट यांनी उपस्थितांना दिला.
शहर चांगले करायचे आहे, आत्म्यालाही सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला. महापालिकेच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या नव्या अग्निशामक दलाच्या अत्याधुनिक गाडीच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये शिरसाट यांनी हे विधान केले. भोंदू अशोक खरात याच्या अंधश्रद्धेला बळी पडलेल्या आणि त्यातून अनेक प्रकरण बाहेर येत असताना शिरसाट यांनी केलेले हे विधान त्यांच्या अंगलट येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
1. संजय शिरसाट यांनी काय वक्तव्य केले?
महापालिकेची इमारत कब्रस्तानावर असल्याने समस्या निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला.
2. या वक्तव्यामुळे वाद का निर्माण झाला?
भूत आणि आत्म्यांबाबत केलेल्या दाव्यामुळे हे वक्तव्य वादग्रस्त ठरले.
3. त्यांनी कोणता सल्ला दिला?
महापालिकेची इमारत दुसऱ्या योग्य ठिकाणी बांधण्याचा सल्ला दिला.
4. हा मुद्दा कोणत्या संदर्भात मांडला गेला?
महापालिकेतील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.
5. यावर पुढे काय होऊ शकते?
या वक्तव्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा आणि वाद वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.