Chhatrapati Sambhajinagar : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'योजनेच्या जानेवारीचा हप्ता अद्याप लाडक्या बहिणींना मिळालेला नाही, अशातच नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने तब्बल 15 टक्के एसटी भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ देखील होणार आहे. महागाईमध्ये होरपळत असलेल्या सर्वसामान्यांना हा मोठा फटका असला तरी सत्ताधारी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र एसटी भाडे वाढीचे समर्थन केले आहे.
चांगल्या सुविधा देण्यासाठी भाडे ढ गरजेची असल्याचे अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्त्यावर उतरत चक्काजाम केला आणि एसटी भाडेवाडीचा तीव्र निषेध केला. एकीकडे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे अन् दुसरीकडे भाडे वाढ करून र्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावायची,असा हा प्रकार असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला.
एसटी दर वाढीच्या विरोधात राज्यभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने रस्त्यावर उतरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथील एसटी मध्यवर्ती बसस्थानकासमोर (Ambadas Danve) अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.तर नांदेडमध्ये शिवसैनिकांनी या निषेधार्थ महायुती सरकार आणि परिवहन मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र निषेध केला.
महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन महिना होत नाही तोच एसटी दर वाढीच्या निर्णयाने सामान्यांना धक्का बसला. याशिवाय वीज दर वाढीचा प्रस्ताव दरबारी निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. एक फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडे वाढीची अंमलबजावणी होणार आहे. एसटीची ही भाडेवाढ अतिशय अन्यायकारक आहे. एसटी प्रवाशांच्या व्यथा तुम्हाला काय माहित?एसटी ही शहरी आणि ग्रामीण भागात प्रवासाचे मुख्य साधन आहे.
महिलांना 50% तिकीट दरात सवलत असली तरी त्यांच्या शिवाय एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या राज्यभरात कोटीमध्ये आहे. अशावेळी याचा फटका सामान्य लोकांना बसणार आहे. भाडे वाढ सत्ताधाऱ्यांनी तात्काळ मागे घ्यावी,यासाठीच आमचे आंदोलन असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र सरकारने केलेल्या एसटी दर वाढीचा निर्णय योग्य आणि गरजेचा असल्याचे म्हटले आहे.
देशात विमान प्रवासाच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे.एसटी तर्फे राज्यातील जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठीच ही वाढ करण्यात आली आहे.ती गरजेची असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. दरम्यान एसटी दर वाढीच्या विरोधात राज्यभर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा अंबादास दानवे यांनी संभाजीनगरात दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.