Mla Satish Chavan Send Letter To Railway State Minister Danve News
Mla Satish Chavan Send Letter To Railway State Minister Danve News Sarkarnama
मराठवाडा

जालन्याच्या पीटलाइनसाठी दाखवली तशीच तत्परता औरंगाबादसाठीही दाखवा...

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : आधी औरंगाबादची रेल्वे पीटलाइन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याला पळवली, ओरड झाल्यानंतर औरंगाबादलाही रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. पण जालन्याच्या पीटलाइनला निधी देवून तीच काम देखील सुरू झाले. तर (Aurangabad) औरंगाबादची पीटलाइन मात्र अद्यापही कागदावरच आहे. यावरून मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना टोला लगावला आहे. जालन्याच्या पीटलाइनसाठी जशी तत्परतता दाखवली तशीच औरंगाबादसाठी देखील दाखवा, असे आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

सतीश चव्हाण यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन पाठवून औरंगाबादच्या पीटलाइनला वेग देण्याची मागणी केली आहे. (Railway) रेल्वे बोर्डाने मे २०२२ मध्ये औरंगाबादमध्ये सोळा बोगींच्या पीटलाइनला मंजूरी दिली. यासाठी २९ कोटी ९४ लाख रूपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप निधी न मिळाल्याने प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पीटलाइनचे काम सुरू झालेले नाही.

त्यामुळे औरंगाबाद येथे त्वरित पीटलाइन सुरू करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. औरंगाबाद येथे रेल्वेची पीटलाइन व्हावी यासाठी सतीश चव्हाण यांनी देखील पाठपूरावा केला होता. २९ मार्च २०२२ रोजी यासंदर्भात त्यांनी दिल्ली येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पीटलाइन सुरू करावी अशी मागणी केली होती.

त्यांनी देखील या मागणीचा सकारात्मक विचार करून हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वस्त केले होते. त्यानुसार रेल्वे बोर्डाने औरंगाबादमध्ये सोळा बोगींच्या पीटलाइनला मंजूरी दिली, निधीही मंजूर केला. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप निधी न मिळाल्याने प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पीटलाइनचे काम सुरू झालेले नाही.

त्यामुळे औरंगाबादसाठी मंजुर झालेली पीटलाइन कागदावरच असल्याचे चव्हाण यांनी निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे. तर जालना येथे जानेवारी 2022 मध्ये पीटलाइन करण्याची घोषणा झाली. दीडच महिन्यात यासाठी ११६ कोटींचा निधी मिळून निविदाही अंतिम झाली. तसेच प्रत्यक्षात कामही सुरू झाले. ही बाब अभिनंदनीय आहे.

मात्र औरंगाबाद शहर लोकसंख्या, औद्योगिकरण, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे जालना येथे पीटलाइन सुरू करण्यासंदर्भात आपण जी तत्परता दाखवली तीच तत्परता औरंगाबाद येथील पीटलाइन सुरू करण्याबाबत दाखवावी, अशी अपेक्षा औरंगाबादकरांच्यावतीने व्यक्त करत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. औरंगाबाद येथे देखील त्वरित पीटलाइन सुरू झाल्यास मराठवाड्यासाठी ते फायद्याचेच ठरेल. त्यामुळे या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देखील चव्हाण यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT