<div class="paragraphs"><p>Raj Thackeray-Dashrathe</p></div>

Raj Thackeray-Dashrathe

 

Sarkarnama

मराठवाडा

सुहास दाशरथेंना मुंबईचा ‘गॉडफादर’ मिळालाच नाही !

अतुल पाटील

औरंगाबादमनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचा दौरा म्हटले कि, औरंगाबादच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. राज ठाकरे विमानतळावर आले कि, जिथे ते थांबणार आहेत, तिथंपर्यंत दुचाकी वाहन रॅली ठरलेली असायची. गेल्या दोन वर्षात ते शहरात दोनदा येऊन गेले. २०२० च्या सुरवातीला आणि २०२१च्या शेवटी. दोन्ही वेळेस त्यांचे शहरातील महावीर चौकात जंगी स्वागत झाले. या स्वागत कार्यक्रमाच्या वेळाही गर्दीच्या निवडल्या. या दोन्ही वेळेस जिल्हाध्यक्ष होते ते, शिवसेनेतून आलेले सुहास दाशरथे.

सुहास दाशरथे हे मनसेचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून शहरात तीनदा मोठे कार्यक्रम झाले. यातले दोन राज ठाकरेंच्या उपस्थितीत झाले. यातील २०२० मधील तिथीनुसार शिवजयंती आणि परवा झालेला मराठवाड्यातील पदाधिकारी मेळावा तर, तिसरा मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबद्दल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर केलेले एकदिवसीय आंदोलन. गर्दीच्या दृष्टीने तिन्ही कार्यक्रम मोठे झाले.

राज ठाकरेंच्या उपस्थितीतीत शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथेंसाठीचा तो पहिलाच कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी शक्तीप्रदर्शन केले आणि राज ठाकरे यांची रॅली शिवसेनेचा बाेकिल्ला गुलमंडीतून नेण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र, नंतरच्या दोन कार्यक्रमात ते स्टेजवर कमीच दिसले. तेव्हाच पक्षातंर्गत कलहाची सुरवात झाली कि काय अशी शंका येत होती. त्यांच्या वर्तुळात भाजप सोबत जाण्याची चर्चा नेहमी होत असत, यामुळेही त्यांचा बळी घेतल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

स्थापनेपासून औरंगाबादेत मनसेला राजकारणातील मोठा चेहरा मिळाला होता. तो सुहास दाशरथे यांच्या रुपाने. पण त्यांना पद मिळाल्यापासून कोरोनाची सुरवात झाली. कोरोनाच्या काळात गरजूंना अन्नवाटप, लॉकडाऊनमध्ये रुग्णांना मोफत औषधी वाटप तसेच, शहरातील पाणी, रस्ते प्रश्‍नांवरही त्यांनी आक्रमक आंदोलने केली. यावेळी शहरातील इतर पदाधिकारी मनसे म्हणून एकत्र काम करण्याऐवजी त्यांचा सवतासुबा सांभाळण्यात व्यस्त होते.

दाशरथे यांना पक्षातील एकाही पदाधिकाऱ्याची ‘मनसे’साथ मिळाली नाही. उलट त्यांच्या विरोधात काम करणारे गट वारंवार मुंबईच्या वाऱ्या करताना दिसले. जिल्हाध्यक्ष पदावरून दाशरथेंना का हटवले, हे पक्षाला माहित असले तरी, दाशरथे हे मुंबईत आपला गॉडफादर तयार करू शकले नाही, हे देखील त्यांच्या हटवल्या जाण्या मागचे एक कारण असू शकते. मनसे नेते दिलीप धोत्रे यांना मराठवाड्याची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांना १५ शाखा सुरू करण्याचे टार्गेट दिले होते.

त्याची जबाबदारीही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर वाटून दिली होती. त्यात कमी पडले म्हणून पद गेले का? अशीही विचारणा होतेय. असं असले तरी, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बढती दिली आहे. यात प्रत्येकाचा कुणी ना कुणी मुंबईत गॉडफादर आहे. राज ठाकरेंचा दौरा असला कि, जे बॅनर लागतात, त्यावरून स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मुंबईतील त्यांचे गॉडफादर कळून जातात. कदाचित बॅनरवरील फोटोवरून पक्षाचा कुठलाही प्रोटोकॉल नसल्याने असे होत असावे.

मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी लावलेल्या बॅनरवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांचे अपवादात्मक दिसलेले फोटोही काही वेगळेच संकेत देत होते. त्यांची जागा ज्या नव्या चेहऱ्यांनी घेतली, ते मनसेच्या निर्णय प्रक्रियेतील महत्वाचे चेहरे आहेत. ही बाब देखील बदलाला कारणीभूत असू शकते.

जिल्हाध्यक्ष पदावरून दाशरथेंना जरी हटवले असले तरी, त्यांनी ‘साहेब.. माझं काय चुकलं? असा विनंती वजा प्रश्‍न विचारत मनसैनिक म्हणून कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे. अनेक पक्षाचे पदाधिकारी त्यांना भेटून जात आहेत. मात्र चार दिवस उलटूनही त्यांनी आपला संयम सोडलेला नाही. त्यांचे कार्यकर्ते काहीवेळ आक्रमक झालेले पहायला मिळाले, त्यानंतर ते आता वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT