Mp Imtiaz Jali Aurangabad
Mp Imtiaz Jali Aurangabad Sarkarnama
मराठवाडा

इथला शेतकरी रोज आत्महत्या करतोय; त्याच्यासाठी बंद कधी पुकारणार?

जगदीश पानसरे

औरंगाबाद ः लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारल्याची घटना संतापजनक आणि निषेधार्य आहेच. त्याला भाजप आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकार जबाबदार आहे. यातील आरोपी कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण या घटनेचे निमित्त करून आपली राजकीय पोळी भाजू पाहणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लाज वाटली पाहिजे, असा संताप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

लखीमपूरची घटना दुर्दैवी आहेच, पण इथे महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी तुम्ही बंद कधी पुकारणार? रस्त्यावर कधी उतरणार याची आम्ही वाट पाहत आहोत, असा टोला देखील इम्तियाज जलील यांनी लगावला. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीर हिंसाचार घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांनी आज बंद पुकारला.

या बंदला एमआयएमचा पाठिंबा नव्हता. या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता, राज्यातील शेतकरी, व्यापारी अडचणीत असतांना बंद पुकारून त्यांना वेठीस धरतांना सत्ताधारी पक्षांना लाज वाटायला पाहिजे होती. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेला हा घाणेरडा प्रकार आहे. लखीमपूरची घटना दुर्दैवी आणि तेथील सत्ताधाऱ्यांच्या मानसिकता दर्शवणारीच आहे.

त्याचा निषेध व्हायलाच हवा, पण हे करत असतांना बंद पुकारून, लोकांचे रोजगार, व्यवसाय बूडवून तुम्ही काय साध्य केलेत? असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला. मराठवाड्यात आणि जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. घरदार, पशुधन, जमीनी,पीकं सगळ काही उधवस्त झाले. शेतकरी सरकारकडे मदतीसाठी डोळे लावून बसला आहे.

पण मंत्री, पालकमंत्री फक्त येतात, शेतात जाऊन पाहणी केल्याचे नाटंक करतात, फोटो काढून फक्त बैठकावर बैठका घेतात. प्रत्यक्षात शेतकऱ्याला मदतीचा एक रुपयाही दिला गेला नाही. मग लखीमपूरच्या घटनेसाठी बंद पुकारून रस्त्यावर उतरणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीनही सत्ताधारी पक्षाना माझा सवाल आहे, की राज्यात शेतकरी दररोज आत्महत्या करत असतांना त्याला वाचवण्यासाठी तुम्ही बंद कधी पुकारणार आहात?

मी देखील त्यात निश्चित सहभागी होईल. पण केवळ राजकारण करायचे आणि सत्ता भोगायची असा निर्लज्जपणा सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे आजचा बंद म्हणजे सत्ताधाऱ्यांचे नाटक होते, असी टीका देखील इम्तियाज जलील यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT