Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Maratha Reservation : सरकारचा जीआर अमान्य; मनोज जरांगे उपोषणावर ठाम

अनुराधा धावडे

Manoj Jarange Decision : "मराठा समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला काम करायचं आहे, पण सरकारने आपल्या ७ सप्टेंबरच्या मागण्यांमध्ये कोणतीही दुरुस्ती न केल्यामुळे माझं उपोषण सुरूच राहणार, अशी प्रतिक्रिया देत आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. "सरसकट आरक्षण द्या, कुणबी प्रमाणपत्र द्या, तातडीने प्रमाणपत्राचे वाटप करा, त्याचे एक पत्र आम्हाला मिळायला हवे, असं मत मांडत मनोज जरांगे पाटील यांनी नमूद केलं.

मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केली. सरकारच्या जीआरनंतर जरांगे पाटलांनीदेखील सरकारशी चर्चा करण्यासाठी एक शिष्टमंडळ मुंबईला पाठवलं. काल मध्यरात्री झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांचे शिष्टमंडळ जालन्यात दाखल झाले. त्यानंतर जरांगे पाटील काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजप नेते अर्जुन खोतकर यांनी उपोषणस्थळी दाखल होत राज्य सरकारचा लिफाफा जरांगे पाटील यांच्याकडे सादर केला. त्यानंतर राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडत राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

२००४ मधल्या जीआरमध्ये दुरुस्त्या करून मराठा समाजाला तत्काळ प्रमाणपत्रे देण्यात यावीत. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले, आमचे लोक, महिलांना मारहाण झाली, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी, पण ती एकही कारवाई झाली. पण ज्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत ते मुंबईत खुलेआम फिरत आहेत. पण आतापर्यंत एकावरही कारवाई झाली नाही. लाठीमाराचे आदेश देणाऱ्या एसपीवर निलंबनाची कारवाई केली नाही, अशी उघड नाराजीही त्यांनी या वेळी बोलून दाखवली.

७ सप्टेंबरच्या जीआरमध्ये कोणताच बदल झालेला नाही. सरकारने आपल्या मागण्यांमध्ये काहीही दुरुस्ती केली नाही. पण, कोणी कितीही बोलू द्या, काहीही झालं तरी शांत राहा, आपल्याला आपल्या समाजासाठी लढा द्यायचा आहे. आपल्यामुळे कोणालाही हानी होऊ द्यायची नाही, असंही जरांगे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केलं.

अर्जुन खोतकर म्हणाले, आरक्षणाबाबतीत नवा इतिहास निर्माण करू पाहत आहेत ते जरांगे पाटील, मनोज पाटील यांच्या प्रकृतीबाबत त्यांचे सर्व निरोप शासन दरबारी मांडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अधिकाऱ्यांसह अडीच वाजेपर्यंत बैठक पार पडली. मनोज पाटील यांचा लढा यशाच्या दिशेने गेला पाहिजे. हा इतिहास लिहिला जाईल. जरांगेंना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत राहू. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं, अशी जरांगे पाटील यांची इच्छा आहे. सरकार एक एक पाऊल पुढे टाकत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT