Rajesh Tope - Jayant Patil News Sarkarnama
मराठवाडा

MLA Rajesh Tope As Incharge : टोपेंची जबाबदारी वाढली, जयंत पाटलांनी दिला पाच जिल्ह्यांचा भार..

सरकारनामा ब्युरो

Aurangabad Political News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत कायम राहिलेले माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. (Rajesh Tope As A Incharge News) अजित पवार गटाने संघटनात्मक बांधणीसाठी आपल्या मंत्र्यांकडे विविध जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर आता शरद पवार गटही सक्रीय झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रभारींच्या नावांची घोषणा केली आहे.

यात मराठवाड्यातील (Marathwada) सर्वाधिक पाच जिल्ह्यांचा भार राजेश टोपे यांच्यावर सोपवला आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर मराठवाड्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात रसद मिळाली होती. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे देखील अजित पवारांकडे जाणार, अशा चर्चा त्यावेळी सुरू होत्या. परंतु टोपे यांनी आपल्या निष्ठा शरद पवारांपाशीच असल्याचे मेळाव्याला उपस्थितीत राहून दाखवून दिले होते.

त्यानंतर मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पुणे दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि ते काही आमदारांसोबत अजित पवार गटासोबत जाणार, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यावेळी देखील टोपे यांचे नाव समोर आले होते. परंतु शरद पवार जेव्हा मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले तेव्हा राजेश टोपे हे त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरत होते. बीड येथील स्वाभीमान सभेतही टोपे यांनी भाषण करत अजित पवार गटावर टीका केली.

तसेच नव्याने पक्ष बांधण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले होते. आता जयंत पाटील यांनी राजेश टोपे यांच्याकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिव या पाच जिल्ह्यांचा भार प्रभारी म्हणून सोपवला आहे. राजेश टोपे यांचा महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोग्यमंत्री असतांना संपुर्ण राज्यातील जनतेशी संपर्क आला होता.कोरोना काळात मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याकडे त्यांनी वैयक्तिक लक्ष दिले होते.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोरोना काळात राज्याच्या जनतेची काळजी घेणारे म्हणून राजेश टोपे यांचे सर्वत्र कौतुक झाले होते. शांत आणि संयमी स्वभावाच्या टोपे यांच्याकडे मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याचे प्रभारी पद देत जयंत पाटील यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांना आता अजित पवार गटाचे मंत्री धनजंय मुंडे, संजय बनसोडे आणि दिलीप वळसे पाटील यांच्याशी दोन हात करत संघटनेला बळ द्यावे लागणार आहे. राज्य पातळीवरच्या नेत्यांची त्यांना वेळोवेळी मदत मिळणार असली तरी खरे शिवधनुष्य जिल्हा प्रभारी म्हणून टोपे यांनाच पेलावे लागणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT